
भाईंदरच्या उत्तन परिसरात 22 फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका 75 वर्षीय वृद्धाच्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात उत्तन पोलिसांना यश आले आहे. हत्या झालेल्या कंपनी मालकाने कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता. त्यानंतर या मुलीने आपल्या 17 वर्षीय मित्राच्या मदतीने कंपनी मालकाची डोक्यात लादी घालून हत्या केली.
किशोर मिश्रा (75) यांनी आपल्या नायगावमधील कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. हा प्रकार या मुलीने आपल्या 17 वर्षीय मित्राला सांगितला. त्यानुसार दोघांनी मिश्रा यांना मारण्याचा कट आखला. मिश्रा हे बालेशाह पीर दर्गाजवळ आले असता या दोघांनी त्यांची डोक्यात लादी घालून हत्या केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तन पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.