
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. शाळकरी मुळे, वयोवृद्धांसह सर्वच लालपरीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु भंडारा जिल्ह्यातील प्रवाशांना एसटीने प्रवास करायला आता भीती वाटू लागली आहे. कारण मागील तीन दिवसांपासून लालपरी रस्त्यातच बंद पडत असून प्रवाशांनाच बसला धक्का मारावा लागत आहे.
भंडारा जिल्ह्यातील प्रवासी लालपरीला वैतागले आहेत. तसेच लालपरीने प्रवास करावा की नको? असा प्रश्न सुद्धा त्यांना भेडसावत आहे. कारण मागील तीन दिवसांपासून एसटी बस रस्त्यावर बंद पडत असून तिला प्रवासीच धक्का देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर गारेगार प्रवासासाठी प्रसिद्ध असणारी शिवशाही सारखी बस सुद्धा रस्त्यावर बंद पडत असल्याने प्रवाशी हवालदील झाले असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारा जिल्ह्यात एसटी बसचे एकूण तीन आगार आहेत. या तीन आगारांमध्ये 224 बस आहेत. भंडारा आगारात 68, साकोली आगारामद्ये 79 आणि तुमसर आगारामध्ये 77 बस आहेत. असे असताना लालपरी आजारी झाली आहे की? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.