सायबर फसवणुकीला पडू नका बळी; सरकारने दिलेल्या या टिप्स Follow करा 

देशातून रोज सायबर फसवणुकीची नवीन प्रकरणे समोर येत असतात. यात सामान्य माणसाची अतिशय हुशारीने फसवणूक केली जाते. त्यामुळे हिंदुस्थानातील लोकांना या फसवणुकीतून वाचवण्यायाठी सरकारी एजन्सीने काही टिपण्या दिल्या आहेत. जेणेकरून आपल्याला या फसवणुकीचा फटका बसणार नाही.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) या सरकारी एजन्सीने X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी वन टाइम पासवर्ड फ्रॉड OTP सायबर फसवणुकीपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबाबत माहिती दिली आहे. हे टाळण्यासाठी सेफ्टी टिप्सही दिल्या आहेत. यासाठी काही मुद्दे सांगण्यात आले आहेत, ज्याचे अनुसरण करून वापरकर्ते सहजपणे स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात.

फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी काही खास सुरक्षा टिप्स पुढीलप्रमाणे-

  • बँक किंवा इतर वित्तीय प्राधिकरणाच्या टोल फ्री नंबरवरून अनेकदा आपल्याला कॉल येतात. यानंतर ते तुम्हाला OTP विचारतात. मग यातूनच तुमची फसवणूक होते. त्यामुळे अशा कॉल्सपासून सावध रहा.
  • बँक संदर्भातील तपशील, बँकेच्या डेबिट कार्डचे तपशील, OTP, जन्मतारीख आणि खाते क्रमांक इत्यादी चुकूनही, अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि संदेशांवर शेअर करू नका.
  • बँक नंबर किंवा कोणत्याही सेवेची पडताळणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटची मदत घ्या.
  • कॅशबॅक आणि रिवॉर्ड्सच्या हव्यासामुळे फोन कॉल, मेसेज किंवा ऑनलाइन लिंक्सवर चुकूनही OTP शेअर करू नका.

OTP फसवणूक म्हणजे काय?

बँका बऱ्याचदा त्यांच्यातील व्यवहार प्रमाणित करण्यासाठी OTP चा अवलंब करतात. त्यामुळे हे एक सुरक्षित माध्यम मानले जाते. मात्र याचा फायदा फसवणूक करणाऱ्या टोळीला होतो. सायबर ठग वेगवेगळे बहाणे करून किंवा eSIM च्या मदतीने तुमचा OTP ऍक्सेस करतात. मग याद्वारे तुमचे बँक खाते रिकामी करणे त्यांना सहज सोपे होते.

अनेक बँका OTP इत्यादींच्या मदतीने वैयक्तिक कर्ज देखील देतात. नुकतीच नोएडामध्ये राहणारी एक महिला eSIM घोटाळ्याची बळी ठरली आहे. यादरम्यान महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. याशिवाय त्याने महिलेची मुदत ठेव मोडली आणि नंतर त्याच्या बँकेतून वैयक्तिक कर्जही घेतले. अशा प्रकारे त्यांची 27 लाखांची फसवणूक करण्यात आली.