Book reading- स्वतःमध्ये आंतरिक बदल घडवण्यासाठी वाचन आहे उत्तम पर्याय! वाचनाचे आपल्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व

‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. वाचनाचं महत्त्व हे आपल्या आयुष्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. एकूणच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन करणं हे खूपच गरजेचं आहे. वाचनामुळे आपल्यामध्ये खूप मोठे  आंतरिक बदल घडत असतात.

 

एलन मस्क यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने “तुम्ही रॉकेट बनवणे कुठे शिकलात?” असा प्रश्न केला असता त्याने उत्तर दिले की  “ मी बरीच पुस्तके वाचलीत.” हे उत्तर ऐकून वाचनाचं काय महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल..  सर्वांगिण वाचनाच्या सवयी मुळे तुम्ही केवळ माहितीच्या जोरावर त्या क्षेत्रावरही  हुकूमत गाजवू शकता. 

 

तुम्हाला माहितीए का.. आपला मेंदू हा  use it or lose it या तत्वावर काम करतो. म्हणजेच काय तर आपल्या मेंदूचा वापर हा वारंवार करण्यासाठी वाचन हे खूप गरजेचं आहे. आठवणी असोत किंवा अभ्यास काही असो त्यांचा पुनर्वापर झाला नाही, त्यांना उजाळा दिल्या गेला नाही की, ते सर्व आपल्या स्मृतीतून नष्ट होतं. म्हणूनच मेंदूला नियमित वाचनाचं खाद्य देणं खूपच गरजेचं आहे.

सध्याच्या रिल्स आणि शाॅर्टसच्या भडीमारात केवळ काही सेकंदात आपण डोळ्याखालून शब्द घालतो. ते शब्द पुढच्या सेकंदाला आपण विसरतोही. नियमित वाचनामुळे आपली एकाग्रता वाढते. म्हणूनच ध्यान करणं आणि वाचन करणं या दोन्ही क्रिया या एकमेकांना पूरक आहेत. 

“दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे” असं रामदासस्वामी यांनी फार पूर्वीच म्हटलं होतं. ज्या माणसाचे आयुष्य अनुभव आणि वाचनाने समृध्द झाले आहे असा माणूस आपल्या क्षेत्रात तर उत्तम कामगिरी करतोच, पण चांगला माणूस म्हणनू देखील तो नावाजला जातो. वाचनातून आपल्याला स्थिती,काळ,परिस्थिती, यानुसार अनुभव तर मिळत असतो पण वाचनातून ज्ञान आणि समजही मिळते.