मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह 9 जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या 9 जणांपैकी 6 जण मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. यावरच आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही किती काहीही केलं तरी मी थांबणार नाही, असं जरांगे म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ”मराठा आरक्षण न देण्यासाठी आणि माझं तोंड बंद करण्यासाठी नवीन चाल आणि नवीन षड्यंत्र रचत आहेत.” मेहुण्यावर कारवाई झाल्यावर ते म्हणाले, माझ्यासाठी समाजापेक्षा मोठा कोणी नाही. मी समाजासाठी कुटुंबालाही पाहत नाही. तुम्हाला मी घाबरून गुप्प बसणार नाही.” ते म्हणाले, माझं तोंड बंद करण्यासाठी नोटीस देता, ते होणार नाही.
मनोज जरांगे म्हणाले की, ”यावेळी त्यांनी मला गोड बोलून उपोषण सोडायला लावलं. दिल्लीतून शब्द दिला की, आम्ही तात्काळ मागण्या मान्य करू. त्यालाही आता 13, 14 दिवस झालेत.” ते म्हणाले, काही केलं तरी मी थांबत नाही, केस केले तरी थांबले नाही, एसआयटीत काही निघालं नाही. इतके गुन्हे दाखल केले तरी थांबले नाही. कारण आमच्या सगळ्या आंदोलकांचं एकच मत आहे की, आमचा जीव गेला तरी चालेल. मात्र राज्यातील कोट्यवधी मराठ्यांना न्याय मिळायला हवा.”