बारसू प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांची उद्या विधिमंडळावर धडक

राजापूरमधील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी 9 जुलै रोजी विधिमंडळ अधिवेशनावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्प रद्द करा अशी त्यांची मागणी आहे.

कोकणचे रासायनिक गटार होऊ नये म्हणून बारसू पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थ गेली तीन वर्षे तेथील प्रस्तावित रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाविरुद्ध संघर्ष करत आहेत. प्रकल्पाला विरोध केल्यामुळे दडपशाहीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून ग्रामस्थ व कोकणवासी, महाराष्ट्रातील पर्यावरणवादी तसेच विविध कष्टकरी जनसंघटना 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. आतापर्यंत विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशन काळात त्यांनी आंदोलने केली, परंतु सरकारने काहीच दखल घेतलेली नाही. बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित न करण्याच्या मागणीवर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला नाही, असे रिफायनरीविरोधी संघटनेने म्हटले आहे.