अजितदादांच्या ‘जनसन्मान’विरोधात बंद

अनगर अपर तहसील कार्यालय मंजूर केल्यानंतर उद्भवलेल्या संतप्त जनभावनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जनसन्मान यात्रे’चा मोहोळ तालुक्यातील जनतेने कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला. या ‘जनसन्मान यात्रे’च्या दरम्यान अजित पवार राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने आणि मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगले. अजित पवारांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता त्यांना झापल्याचा प्रचार राजन पाटील गटाकडून करण्यात आल्यानंतर उमेश पाटील यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले.

…तर राजकारणातून सन्यास घेईन – उमेश पाटील

‘जनसन्मान यात्रे’चा मोहोळ मतदारसंघातील यापूर्वीचा दौरा माझ्यामुळे रद्द झाला, असे मी म्हणाल्याचे पुरावे दिले तर मी राजकारणच काय, सार्वजनिक जीवनातूनही संन्यास घेईन, असा खुलासा राष्ट्रवादीचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला. सत्ता असो अथवा नसो अजितदादा माझे नेते होते आणि यापुढेही राहतील, असे सांगत जर सत्ता नसती तर माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी अजितदादांचे नेतृत्व स्वीकारले असते का, असा सवालही उमेश पाटील यांनी केला.

तालुक्यात अंतर्गत गटबाजी उफाळली

मोहोळमधील सभेत अजित पवार म्हणाले, दादांचा पाठीमागचा दौरा माझ्यामुळे रद्द झाल्याचे काहीजण सांगत आहेत. माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असे वक्तव्य केले. अजितदादांचे हे वक्तव्य उमेश पाटील यांना उद्देशून असल्याचा संदेश एका गटाकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यातच आमदार यशवंत माने यांनी भाषणात, ‘पक्षविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना आवरावे’, अशी मागणी उमेश पाटील यांचे नाव न घेता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. याची री ओढत तटकरे यांनी पक्षात बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे सांगितले. यामुळे अजित पवार गटात गटबाजी उफाळल्याचे दिसून आले.