बदलापूर एन्काउंटर प्रकरण; पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा, हायकोर्टात अ‍ॅम्युकस क्युरी मंजुळा राव यांचा दावा

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणातील दोषी पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा. कारण हा एन्काऊंटर प्रथमदर्शनी बनावट असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन चौकशी अहवालात नोंदवण्यात आला आहे, असा दावा सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नसून पोलिसांनी त्याची हत्या केली आहे. या बनावट एन्काऊंटरचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत करावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदेच्या वडिलांनी केली. नंतर ही याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. न्यायालयाने या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकील मंजुळा राव यांची अॅम्युकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्यास नेमके काय करावे यासाठी  सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर या मार्गदर्शक तत्त्वानुसार  कार्यवाही झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का, असा मुद्दा विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी उपस्थित केला. याला अॅड. मंजुळा राव यांनी विरोध केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाच संशायस्पद आहे. हा एन्काऊंटर बनावट असल्याच्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन अहवालात नोंदवला आहे. अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा, असा युक्तिवाद अॅड. राव यांनी केला.

तक्रारीची दखल घ्यायला हवी

हा एन्काउंटर खोटा असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याची पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवायला हवा होता, असेही अॅड. राव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.