![pollution](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/pollution-696x447.jpg)
>> अजित कवटकर, [email protected]
सात्त्विकता हे हिंदू धर्माने या भूमीवर केलेले संस्कार, ज्याचे अनुकरण जगाने केले. वास्तुशास्त्राची जननी हीच भूमी होय. येथील जीवनाच्या प्रत्येक आचरणात शुद्धता, सद्गुण, सात्त्विकता होती. आज मात्र स्वच्छतेसाठी अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागते आहे. कुठे लोप पावले ते सुसंस्कार? पृथ्वी, जल, वायु, अग्नी, आकाश या पंचमहाभुतांनी आपण बनलो आहोत. म्हणूनच या सर्वांना देवाचे रूप देऊन आपण त्यांना पुजतो. परंतु आज मानवनिर्मित प्रदूषणाने या सगळ्याची अशी दयनीय अवस्था केली आहे की बहुधा आज तीच पंचमहाभूतं त्यांना या विषारी वातावरणातून मुक्त करण्यासाठी, मानवाकडेच याचना करत असावीत.
साधुसंतांचा देश, मंदिरांचा-देवदेवतांचा देश, योग-आयुर्वेदाचा देश, सात्त्विक संस्कृतीचा देश, सण-उत्सवांचा देश, मानवतावादी मूल्यांचा देश, धर्माचरण-न्याय जीवन पद्धतींचा देश, पराक्रमी योद्ध्यांचा – शूर शहिदांचा देश, वैविध्याचा – निरपेक्ष सर्वसमावेशकतेचा देश, विद्वानांचा – कलाकौशल्याचा देश, समृद्ध वन्यजीवसृष्टीचा – संपन्न निसर्गसंपदेचा देश, प्राचीन वारसा – आधुनिक वाटचालीचा देश…. हिंदुस्थानाबद्दल ओसांडून वाहणारा अभिमान हा त्याच्या गौरवशाली इतिहासाची श्रेष्ठता वर्णितो. आपल्या देशाचा इतिहास इतका जाज्वल्य, निर्माणकारी, प्रेरणादायी आहे की, वर्तमानाला व भविष्याला त्या अभिमानास्पद आदर्शांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे अतिशय अवघड वा अशक्य होत आहे. मानवतावादी धर्मसंस्कारांच्या उदात्त जीवनशैलीने घडलेले हे राष्ट्र आज मात्र आधुनिकतेचे विचारवस्त्र परिधान करून त्या प्रत्येक संस्काराला स्वतःच्या सोयीप्रमाणे बदलण्याची घोडचूक करत आहे. इतिहास आणि वर्तमान यांमध्ये त्यामुळेच दिसणारी तफावत आज जगासमोर विरोधाभास दर्शवणारे चित्र उभे करत आहे.
वनस्पतीविना हे मानवी जग शक्य नव्हते आणि जे चालले आहे हे त्या उरल्यासुरल्या वनस्पतीसृष्टीच्या मेहेरबानीवरच. मानव हा जर का या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव आहे, तर मग जे जीवन आहे – त्याचे संवर्धन केले पाहिजे, वाढवले पाहिजे हे सत्य तो का आचरणात आणत नाही? शून्य उपयोगाचे, परंतु जागतिक विक्रमाचे नावलौकिक देणाऱ्या अनेक वायफळ गोष्टींसाठी अब्जो खर्च केले जातात, परंतु एखादे ‘प्रती अॅमेझॉन वन’ निर्माण करून या जगाचे आयु व आरोग्य वाढविण्यासाठी कोणीच आपल्याकडील संसाधन खर्च करायला तयार नाही. उलट, ध्रुवांवरील हिमखंड ज्या वेगाने वितळत आहेत, त्याहून अधिक गतीने अॅमेझॉनचे निर्वनीकरण होत आहे. आपले ‘दंडकारण्य’ केवळ पुराणकथांमध्येच वाचकांना दिसते. वनस्पतीजगताचे ते वैभव या भूमीवर पुन्हा अवतरणे नाही? इथे गरजेपुरते झाडांचे पूजन करायचे आणि फायद्याखातर नंतर त्यांनाच तोडून आपला मार्ग मोकळा करायचा. वन्यजीव प्रेम हे केवळ सोशल मीडियावर ‘लाईक्स’ मिळवण्यासाठी उचंबळून आलेली नौटंकी वाटते. याचाच दृश्य परिणाम असा की, आज आपली वने ही आटून त्यांचे बगिचे झाले आहेत.
सात्त्विकता हे हिंदू धर्माने या भूमीवर केलेले संस्कार, ज्याचे अनुकरण जगाने केले. वास्तुशास्त्राची जननी हीच भूमी होय. येथील जीवनाच्या प्रत्येक आचरणात शुद्धता, सद्गुण, सात्त्विकता होती. आज मात्र स्वच्छतेसाठी अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागते आणि एवढे करूनही रस्त्यांवर पिचकाऱ्या मारत, थुंकत फिरणारे आणि पसरवलेले कचऱ्याचे साम्राज्य पाहिले की प्रश्न पडतो, कुठे लोप पावले ते सुसंस्कार? पृथ्वी, जल, वायु, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांनी आपण बनलो आहोत. म्हणूनच या सर्वांना देवाचे रूप देऊन आपण त्यांना पुजतो. परंतु आज मानवनिर्मित प्रदूषणाने या सगळ्याची अशी दयनीय अवस्था केली आहे की बहुधा आज तीच पंचमहाभूतं त्यांना या विषारी वातावरणातून मुक्त करण्यासाठी, मानवाकडेच याचना करत असावीत.
मंदिरं ही अध्यात्माची केंद्रं होती. विचारमनातील षडरिपुंचा नाश करून त्यात क्षमा, निरागसता, औदार्य, भक्ती, समाधान, धैर्य रुजविणारी ती शक्तीस्थळं असायची. इतरत्र कुठे जरी सापडली असती – नसती तरी इथे मात्र समता होती. देवाच्या छताखाली कोणी राजा नव्हता की कोणी रंक नव्हता. इथे सर्व समान होते. आज मात्र श्रीमंतांना रांगेत उभे राहण्याची गरज लागत नाही. देणगी रूपात पैसे दिले की थेट गाभाऱ्यात. गरीब मात्र तासंतास रांगेत उभा राहून जेव्हा लांबून देवाचे दर्शन घेत असतो, तेव्हा त्याला हात जोडेपर्यंत देखील तिथे समोर उभे राहण्याची मुभा नसते. ढकलून पुढे सरकवले जाते. त्यामुळे तिथे मनःशांती किती आणि अशांती किती प्राप्त होते हे तो भक्तच जाणो. मंदिरं ही आज एक स्वतंत्र अर्थव्यवस्था झाली आहे. त्याग, बलिदान, परोपकार, निःस्वार्थपणाचे तत्त्वज्ञान जगाला सांगणारा आपला देश आज भ्रष्टाचार आणि राजकीय अनैतिकतेने प्रचंड ग्रासला आहे. आपली प्राचीन विद्यापीठं ही ज्ञानदानाची सर्वश्रेष्ठ केंद्रं होती, जेथे जगभरातील विद्यार्थी अध्ययनासाठी येत. परंतु आज, या भारत भूमीत जिथे शास्त्र अंकुरले, जिथून ज्ञानाचा प्रसार झाला तेथील विद्यार्थी आज शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या संस्कृत, योग व आयुर्वेदाने जगाला भुरळ घातली. पण आपल्याला त्याबद्दल किती आसक्ती आहे? तपस्वींच्या, वैराग्यांच्या या भूमीत आज अनावश्यक उपभोक्तावाद, चंगळवाद इतका अनियंत्रित फोफावला आहे की आज मनुष्याचे स्वतःवरच नियंत्रण राहिलेले नाही.
पृथ्वीवरील पोषक वातावरणामुळेच इथे जीवन रुजले, वाढले, बहरले. निसर्गनियमांवर आपण आपली जीवनशैली आखली. निसर्गातील प्रत्येक घटकाच्या नैसर्गिकतेला जपून आपण आपला विकास घडवला. हे असे जोपर्यंत चालत होते तोपर्यंतचा काळ हा जीवसृष्टीसाठीचा सुवर्णकाळ होता, ज्यात धर्म – संस्कार – संस्कृती बहरली. मानवाची श्रेष्ठता याच संस्कारांवर बळकट झाली. आपली संस्कृती तर याबाबतीत इतरांसाठी दीपस्तंभ होती आणि म्हणूनच भारत महान ठरला. परंतु आज आपण ते सर्व अव्हेरण्याची, संकुचित करण्याची, बदलण्याची पराकाष्ठा करीत आहोत. त्यामुळे तो प्राचीन ऐतिहासिक वारसा, की ज्यामुळे भारत भूमीला प्रबुद्धतेची ओळख मिळाली ती आज नामशेष होताना दिसते. आपले जुने आदर्श टिकवूनदेखील आजच्या युगात विकास घडवता येण्यासारखा आहे. किंबहुना तो विकास अधिक शाश्वत असेल. पण हे करणार कोण? कारण आज ‘गव्हर्नन्स’ची परिभाषा ही ‘तोडा-मोडा-झोडा, पण सत्ताखुर्ची टिकवा’ अशी झाली आहे आणि त्यात पराक्रम गाजविण्याची शर्यत आजच्या राज्यकर्त्यांमध्ये लागली आहे. मग देव – देश – धर्माच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा विचार करणार कोण? तो होत असल्याचे भासवले जाते, पण केवळ निवडणुकांच्या वेळी. एरवी सगळं ‘राम’ भरोसे.