मुद्दा – मराठीच्या संवर्धनासाठी…

>> सुनील कुवरे

आज 12 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. लोकसंख्येच्या निकषानुसार मराठीला जगातल्या 20 प्रमुख भाषांमध्ये स्थान आहे. अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी कित्येक वर्षांपासूनची होती. अखेर 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, बंगाली, ओडिया आणि प्राकृत या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्यात अनेक ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला. सरकारी घोषणेने मराठी माणसाच्या लोकभावनेला हात घातला गेला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन केलेल्या समितीच्या प्रयत्नांना अकरा वर्षांनंतर यश मिळाले.

मराठीला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. आता भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य आणि पेंद सरकारची आहे. मराठी भाषेचा अभिजात भाषेच्या श्रेणीत समावेश झाल्याने त्या भाषेच्या क्षेत्रात, विशेषतः शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मराठी भाषेमधील प्राचीन ग्रंथसंपदेचे जतन, दस्तऐवजीकरण करणे. भाषा भवन उभारणे, हिंदुस्थानातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकविण्याची सोय करणे, भाषा भवन उभारणे तसेच मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी अंदाजे पाचशे कोटी रुपये मिळतील.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मराठी भाषेच्या वापराबाबत अधिक सजग होत आहे. नुकताच महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच सरकारी कामकाजात आणि संभाषणसुद्धा मराठी बोलण्याचा आदेश जारी करण्यात आला. हा निर्णय स्वागतार्ह आहे. केवळ कागदोपत्री उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठी ही राजभाषा असून प्रशासकीय कामकाज मराठीतूनच होते. तरीही राज्य सरकारला मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आदेश काढावा लागला हा मोठा विरोधाभास आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेचा प्रभाव वाढेल, पण केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला ऊर्जितावस्था येणार नाही. कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरविण्यासाठी त्या भाषेच्या ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते. तेव्हा मराठी भाषा फक्त राजभाषा नाही तर ज्ञानाची भाषा, व्यवहाराची भाषा व्हायला हवी. भाषा ध्रुवीकरणाच्या काळात मराठी जर ज्ञानभाषा झाली नाही, तर तिचा सामान्य भाषा म्हणूनही निभाव लागणार नाही. यासाठी मराठीची केवळ सक्ती करून चालणार नाही, तर आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर मराठी कशी उतरेल? हे पाहणे महत्त्वाचे आहे. आज जगातील बहुतांश ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ज्या भाषेतून प्रकट होते ती भाषा जगावर अधिराज्य करते. मराठीला वैभव प्राप्त करायचे असेल तर विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करून मराठी भाषिकांनी शोध लावावा. तर मराठी भाषेचे शैक्षणिक महत्त्व वाढेल. ज्ञानभाषा म्हणूनसुद्धा महत्त्व प्राप्त होऊन भविष्यात ज्ञानभाषा नक्की बनू शकते. बदलत्या काळानुरूप शब्द समृद्धता आणावी लागेल. तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचे संवर्धन करून ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच ज्ञानभाषा होण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न केले तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषेत अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.