
>> जगदीश काबरे
हिंदू धर्मशास्त्रातील ईश्वरवाद, अवतारवाद, अध्यात्मवाद, ग्रंथप्रामाण्य आणि पुरोहित वर्चस्व यांच्या चिकित्सेची सुरुवात झाली. त्याअनुषंगाने बाबासाहेबांनी ‘धम्म’ आणि ‘धर्म’ या दोन संकल्पनांत केलेला भेद स्वीकारावयाची भूमिका कोणती असावी याची दिशा दाखवितो. ‘निरीश्वरवादी धर्म’ ही संकल्पना बाबासाहेब पुढे आणतात. निरीश्वरवादी धर्म असू शकतो हे ठसविणे हा बाबासाहेबांचा ‘धर्म’ व ‘धम्म’ या दोन्ही संकल्पनांत फरक करण्यामागील प्रमुख हेतू होता.
ब्रिटिश वसाहतिक सत्ता भारतात स्थिरावल्यानंतर शिक्षण हळूहळू सार्वत्रिक होऊ लागले. त्यामुळे या नवशिक्षित मंडळींमध्ये मध्ययुगीन जातिव्यवस्था आणि धर्म यासंदर्भात चिकित्सेला प्रारंभ झाला. हिंदू धर्मशास्त्रातील ईश्वरवाद, अवतारवाद, अध्यात्मवाद, ग्रंथप्रामाण्य आणि पुरोहित वर्चस्व यांच्या चिकित्सेची सुरुवात झाली. त्याअनुषंगाने ‘निरीश्वरवादी धर्म’ ही संकल्पना बाबासाहेब पुढे आणतात. निरीश्वरवादी धर्म असू शकतो हे ठसविणे हा बाबासाहेबांचा ‘धर्म’ व ‘धम्म’ या दोन्ही संकल्पनांत फरक करण्यामागील प्रमुख हेतू होता. बहुतेक युरोपियन ईश्वरशास्त्रज्ञ हे ईश्वरवादी धर्मालाच धर्म मानायला तयार होते आणि निरीश्वरवादी पंथ हा त्यांच्या दृष्टीने धर्म ठरत नव्हता, परंतु यावर ‘निरीश्वरवादी धर्म असू शकतो’ हे ठासून सांगणे हेही एक उत्तर असू शकते. ईश्वरवादी धर्मात माणूस आणि ईश्वर यांचा संबंध हा केंद्रस्थानी असतो, तर माणूस आणि माणूस यांचा संबंध दुय्यम किंवा आनुषंगिक असतो. धम्मात माणूस आणि माणूस यांच्यातला याच जगातला सदाचाराचा, मैत्रीचा, प्रेमाचा संबंध केंद्रस्थानी असतो आणि ईश्वर, ब्रह्म, परलोक यांसारख्या गोष्टींना त्यात एकतर दुय्यम स्थान असते किंवा नसतेच.
युरोपीय वर्गसमाजातील ईश्वर संकल्पनेने धर्मव्यवस्थेत बजावलेली भूमिका आणि भारतीय वर्णजाती समाजात ईश्वर संकल्पनेने बजावलेली भूमिका यात गुणात्मक फरक आहे. युरोपातील ‘ईश्वर’ वर्गसमाजातील शास्त्रवर्गाच्या हितरक्षणासाठी प्रेषिताच्या रूपातून अवतार घेतो, परंतु त्याच्यापुढे जन्मसिद्ध जातींच्या रक्षणाची जबाबदारी नसल्यामुळे कर्म सिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांत यांना गती देणारी चालक शक्ती म्हणून भूमिका बजावण्याची आपत्ती त्याच्यापुढे येत नाही. भारतातील ‘ईश्वर’ हा वर्ण व जाती या जन्माधिष्ठित संस्थांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. तो जन्मसिद्ध वर्ण जातिव्यवस्था उचलून धरण्यासाठी शास्त्रs, वर्ण वा जाती तसेच कर्म सिद्धांत व पुनर्जन्म सिद्धांत जनमाणसाच्या मनावर ठसवतो.
वर्ण जातिव्यवस्था तिच्या जन्मसिद्धतेमुळे बंदिस्त असते. त्यातून राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील बंदिस्त एकाधिकारशाहीचा पाया तयार होतो. जाती समाजात ईश्वरकेंद्री धर्म या प्रकारे शासन आणि शोषणाचे वैचारिक साधन म्हणून अधिकारवाणीने नियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका वठवितो म्हणून बाबासाहेब मानवकेंद्री धर्माचा पुरस्कार करतात. ईश्वरकेंद्री धर्मात श्रद्धावादाला वाव असतो. जातिव्यवस्थेवर उभ्या असलेल्या ईश्वरकेंद्री धर्मात श्रद्धावादाशी संबंधित अंध धर्मश्रद्धांची एक व्यापक व्यवस्थाच उभी करण्यात येते. शिकारी उत्पादन साधनावर जगणाऱया जाती, शेतीशी संबंधित कारागिरीवर जगणाऱया बलुतेदार जाती आणि कृषिकार्यावर उपजीविका करणारा शेतकरी जाती अशी जातींच्या सामाजिक सोपानांची रचना जाती समाजात असते. पशुपूजा, निसर्गपूजा, पिशाच्च वशीकरण विद्या, अशा जादूटोण्याशी संबंधित जातविशिष्ट अंधश्रद्धांना बळकटी देण्याचे, या जातविशिष्ट श्रद्धांना अवतारवाद, पुनर्जन्मवाद वा आत्मवाद यांच्या श्रद्धा व्यवस्थेत उपांग म्हणून सामावले जाण्यास भरपूर वाव असतो. त्यामुळे हिंदू धर्माला जादूटोण्याच्या पोतडय़ाचे स्वरूप प्राप्त होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच हिंदू धर्माच्या श्रद्धावादावर कडाडून हल्ला करतात. धर्मांतरासंदर्भात बाबासाहेबांनी ज्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत, त्यातून जाती समाजातील ईश्वरकेंद्रित धर्म श्रद्धावादाच्या छत्रीखाली व्यापक अंधश्रद्धांना पावित्र्य प्रदान करणारी विचार व्यवस्था उभी करतो याची आपल्याला सूचना मिळते. 1956 साली धर्मांतर करताना बाबासाहेब म्हणाले होते, ‘मी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे ठरविले आहे. कारण बौद्ध धम्म हा हिंदू धर्माहून फार वेगळा आहे. हिंदू धर्माचा परमेश्वरावर भरवसा आहे. बौद्ध धम्मात परमेश्वर नाही. हिंदू धर्माचा आत्म्यावर विश्वास आहे. बौद्ध धम्म आत्मा मानीत नाही. हिंदू धर्म चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था मानतो. बौद्ध धम्मात चातुर्वर्ण्य नि जातिव्यवस्था यांना थारा नाही.’
थोडक्यात काय, तर बौद्ध धम्मनीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बुद्धाखेरीज सर्व धर्म संस्थापकांनी आपण मोक्षदाते आहोत ही भूमिका घेतली. ब्राह्मणांच्या मताप्रमाणे धर्म म्हणजे यज्ञ आणि देवाला दिलेली आहुती. याउलट बुद्धाने आपल्याकडे मार्गदर्शनाची भूमिका घेतली आणि बाबासाहेबांच्या नवयान बुद्ध धम्मात देवाची जागा नीतीने घेतली. ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ बुद्धाने विचारासाठी मांडला आणि तो बाबासाहेबांनी धम्माच्या रूपात अमलात आणला.
डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली हिंदू धर्मातील अवतारवाद आणि जातिव्यवस्था यांच्या परस्परसंबंधाच्या अभ्यासाची दिशा आपणास बुवाबाजीच्या प्राबल्याचे विश्लेषण देणाऱया समाजशास्त्राच्या मांडणीपर्यंत घेऊन जाते. बुवाबाजीविरोधी प्रबोधनासाठी उपयुक्त वैचारिक हत्यार आंबेडकरवाद उपलब्ध करून देतो. हिंदू धर्मातील अवतारांच्या संकल्पनेची चर्चा बाबासाहेबांच्या हिंदू धर्म चिकित्सेत वारंवार येते. बौद्ध धर्म स्वीकारासाठी अवतार कल्पनेवर विश्वास न ठेवण्याची पूर्वअट आहे. दुसऱया बाजूला जादूटोण्याचे आणि मंत्रशक्तीच्या चमत्कार सामर्थ्याचे हिंदू धर्म परंपरेत असलेले प्राबल्य त्यांच्या टीकेचा विषय आहे.
बुवाबाजीच्या उदयाचे हे समाजशास्त्राrय विश्लेषण आणि ब्राह्मण-वर्चस्वाखालील जातिव्यवस्थेचे समाजशास्त्र यांची सांधेजोड केल्यास बुवाबाजीचे वास्तव पुढे येते. भारतीय समाजातील विविध जाती-जमातींना सामाजिक-राजकीयदृष्टय़ा हीन स्तरावर ठेवणे उच्च वर्णीयांच्या हिताचे होते. ब्राह्मण वर्ण जातींची धार्मिक पवित्रता आणि तिची इतरांपासूनची श्रेष्ठता संरक्षित करण्यासाठी जाती विभाजित आणि सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा परस्परांपासून पृथ्थकता वा संघर्षप्रवण ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे केंद्रीभूत धर्मसंस्था वा प्रेषित या संस्थांच्या निर्मितीस पुरोहितशाहीने नकार दिला. याचा परिणाम काय, तर हिंदू धर्मात आलेला बुवाबाजीचा महापूर! या महापुरात आजही मोठय़ा प्रमाणात बौद्ध समाज वाहून जात आहे आणि बाबासाहेबांची शिकवण विसरली जात आहे हे मात्र खेदजनक आहे.
आजच्या हिंदुत्ववादी वातावरणाने भरलेल्या भारतात अंधश्रद्धा वाढवण्याचे प्रयत्न जोमाने चालू आहेत. त्यातून आजही 21व्या शतकात अंधश्रद्धेचे प्रकार वाढीस लागलेले आहेत. म्हणून आज वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची गरज आहे. चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य शोधून काढण्याचा कार्यकारणभाव जोपासणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय.