
>> प्र. ह. दलाल
इयत्ता दहावी शालान्त परीक्षेच्या ‘मराठी’ (उच्च स्तर) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सालाबादप्रमाणे यंदाही शुद्धलेखनाच्या गंभीर चुका होत्या. परीक्षा मंडळाने काढलेल्या व विद्यार्थ्यांना लेखन नियमांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या असे सूचनेत सांगणाऱ्या परीक्षा मंडळानेच प्रश्नपत्रिकेत लेखन नियमांबाबत स्वतःच असंख्य चुका केलेल्या आहेत. विशेष म्हणजे सदोष प्रश्नपत्रिका याच वर्षी निघाली असेही नाही. गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून हेच नियमितपणे सुरू आहे. दरवर्षी याबाबत त्वरित वृत्तपत्रात लेख/बातमी प्रसिद्ध होऊनदेखील यात काहीही बदल होत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्वतः दरमहा भरमसाट वेतन घेणाऱ्या, मंडळावर डझनावारी तथाकथित तज्ञ व्यक्तींच्या नियुक्त्या करून त्यांच्या मानधन, विविध भत्ते यासाठी लाखो रुपये उधळणाऱ्या अधिकाऱ्यांना बेजबाबदार,अकार्यक्षम याशिवाय अन्य विशेषण नाहीच.
शासनाच्या मराठी भाषा विभागाने 6 नोव्हेंबर 2009 रोजी मराठी भाषेतील लेखन दोष दूर करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ञ समितीच्या शिफारसी स्वीकारून त्याप्रमाणे लेखन करावे असा आदेश काढला. त्यानंतर पुन्हा दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा एक स्पष्ट व सविस्तर आदेश काढून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय पाठ्यपुस्तक मंडळ यांना या लेखन नियमानुसार लेखन करावे असे आदेशित केलेले आहे. याशिवाय अगदी अलीकडे म्हणजे 6 जानेवारी 2025 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काढलेल्या शासनाच्या परिपत्रकात आणि 3 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी भाषेच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकालाही शासनाच्याच अखत्यारीत असणाऱ्या पाठ्यपुस्तक मंडळाने व परीक्षा मंडळाने अक्षरशः तिलांजली दिली आहे
या वर्षाच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पुढील काही गंभीर चुका झालेल्या आहेत.
(1) शासनाच्या दिनांक 10 नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार अंक लेखन करताना इंग्रजी अंक न वापरता 1,2,4 असे मराठी अंक लिहावे अशी स्पष्ट सूचना असताना सदर प्रश्नपत्रिका मात्र सर्वत्र 1, 2, 4.. असे इंग्रजी अंक सर्रास वापरलेले आहेत. (2) उपरोक्त शासन आदेशानुसार श,आणि ल ही अक्षर वळणे चुकीची आहेत (3) सदर प्रश्नपत्रिकेत, दविगु, जिद दी, प्रसीदध, दवार, याप्रमाणे तोडाक्षर पद्धती वापरली असून नियमानुसार ते शब्द द्विगु, द्वंद्व, द्वार, पद्धती, प्रसिद्ध, जिद्द असे असायला हवेत. (4) द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे ‘य’ आल्यास, दय असे न लिहिता द्य, असे लेखन करावे हा नियम झुगारून सर्वत्र विं द य, गद् य, दया वे, विद्यापीठ असे नियमबाह्य लेखन केले आहे (5) सुरुवातीलाच सूचना क्रमांक पाच मध्ये लेखन नियमांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे हे संपूर्ण वाक्यच मुळात लेखन नियमानुसार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान… असेच नाही का? अचूक शब्द ओळखा. यात (vi, v) यात लेखन नियमानुसार एकही शब्द अचूक नाही. सर्व चुकीचे आहेत. अशा शिक्षण खात्याच्या नशिबी लाभलेल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना त्रिवार वंदन करणे व आलिया भोगासी असावे सादर असे म्हणण्याशिवाय करणार तरी काय?