एक्स्प्रेस वेवर अ‍ॅम्ब्युलन्स चालकांकडून लूट, मनमानी पद्धतीने भाड्याची आकारणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची रुग्णवाहिका चालकांकडून लुटमार होत आहे. खालापूर आणि खोपोली परिसरात सुमारे 25 रुग्णवाहिका आहेत. त्यांच्यासाठी कोणतेही दर प्रशासनाने निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे ते जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अवाचे सवा दर घेत आहेत. खोपोलीतून कल्याणमध्ये मृतदेह नेण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने थेट 20 हजार रुपये घेतले होते. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालल्याने अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना आणीबाणीच्या परिस्थितीत मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुर्दैवाने अपघात घडला तर शासनाची किंवा आयआरबी कंपनीची रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. मात्र दोन्ही सेवा उपलब्ध असताना खासगी रुग्णवाहिका चालक मध्येच लुडबुड करून जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी घेत आहेत. त्या बदल्यात अवाचे सवा भाडे घेतले जात आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना कोण घेऊन जाणार किंवा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला त्यांच्या गावी कोण पोहोचवणार यावरून रुग्णवाहिका चालकांत शीतयुद्ध सुरू आहे. हार्ट अटॅकमध्ये मृत्यू झालेल्या भाविकाचा मृतदेह अंबरनाथमध्ये नेण्यासाठी 7 हजार रुपये रुग्णवाहिका चालकाला द्यावे लागले होते.

कमी भाडे घेणाऱ्यांना दमबाजी

ना नफा ना तोटा या तत्त्वावर रुग्णांकडून भाडे आकारणे आवश्यक असते. मात्र रुग्णवाहिकांचे चालक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करीत आहेत. कमी भाडे घेणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना अन्य रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडून दमबाजी केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण हाडप आणि दत्तेश धोत्रे यांनी केला आहे.