
महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणूकीच्या जाहिरानाम्यात केली होती. त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी याची अंमलबजावणी अर्थसंकल्पात करू, असे म्हटले. मात्र आता यांची ताळमेळ जुळेल, असे वाटत असताना या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना सरकारने वाऱ्यावर सोडून दिले. महाराष्ट्र थांबणार नाही, अशी घोषणा सरकारकडून या अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यावर टीका करताना दानवे यांनी म्हटले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.
या अर्थसंकल्पातून लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केली आहे. कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात 1 रुपयाची सुद्धा वाढ कुठल्याही योजनेत या सरकारने केली नाही. महसूली तूट ही 45 हजार 892 कोटी रुपये असून राजकोषीय तूट ही 1, 36, 234 कोटींवर गेली आहे. राज्य सरकारला वारंवार कर्ज घेऊन खर्च चालवण्याची सवय लागली असून याचा फटका भविष्यात राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसणार असल्याची भीती दानवे यांनी व्यक्त केली.
कृषी विभागासाठी फक्त 9, 710 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात केलेली तरतूद ही तुटपुंजी आहे. रोजगार हमी योजनेसाठी 2, 205 कोटी रुपयांची तरतूद ही वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अंत्यत कमी आहे. आरोग्यासाठी 3,827 कोटी आणि शिक्षणासाठी 2959 कोटी रुपयांची तरतूद ही राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे. या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. वैनगंगा नळगंगा, नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली मात्र त्यांच्या कामांना मुहूर्त कधी लागणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण यंदाच्या अर्थसंकल्पातूनही देण्यात आले नाही. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठाऐवजी 4 तास वीज मिळेल,अशी राज्याची स्थिती आहे. प्रत्यक्षात कर्जाच्या ओझ्याखाली राज्य असताना या अर्थसंकल्पातून महायुती सरकारने विकसित महाराष्ट्राचा डंका वाजवण्याचा प्रयत्न केल्याचे टीकास्त्र दानवे यांनी डागले.