
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. देशमुख यांच्या हत्येपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी व सत्ताधारी पक्षातील आमदार करत होते. मात्र ना सरकारने त्यांचा राजीनामा घेतला होता ना धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. सोमवारी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले व संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर अवघ्या 12 तासात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपण सदसद् विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंडे यांना फटकारले आहे. ”विवेक बुद्धी जागी होण्यासाठी तब्बल 84 दिवस लागले आपल्याला”, असा टोला त्यांनी ट्विट करत मुंडे याना लगावला आहे.
धनंजय मुंडे यांचे ट्विट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे.