शिवसेनेला हरवणारा अजून पैदा व्हायचाय; अंबादास दानवे कडाडले

शिवसेना  जिंकत आली आहे. शिवसेना जिंकणारच. शिवसेनेला हरवणारा महाराष्ट्रातच काय देशात अजून पैदा व्हायचा आहे. कितीही मोदी, शहा आणि फडणवीस लटकले तरी शिवसेनेला काही होऊ शकत नाही. मात्र आपल्यातून जे गेले आहेत, त्या गद्दारांना गाडून निवडून येणे हे सगळय़ात महत्त्वाचे आहे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

दानवे म्हणाले, के्ंद्र आणि राज्य सरकारची स्पर्धा लागेल एवढे अपयश यांच्या नावावर आहे. केंद्र सरकारने 748 योजना जाहीर केल्या आहेत, परंतु यातील एकही योजना यशस्वी झालेली नाही. सर्वच योजना केवळ कागदावर असणाऱ्या आहेत. राज्यातही तीच परिस्थिती आहे. रोज घोषणांचा पाऊस सुरू आहे. काल संभाजीनरमध्ये मुख्यमंत्री आले होते. त्यांना चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्र्यांना काळय़ा झेंडय़ाला सामोरे जावे लागते, हेच या मुख्यमंत्री आणि राज्याचे अपयश आहे. गावागावातील चावडी, पारावर केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशाची चर्चा झाली पाहिजे.