
मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार फ्रेश होण्यासाठी खोपोली विश्रामगृहात गेले. मात्र हे विश्रामगृह गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्यामुळे पवार यांना फ्रेश होण्यासाठी थेट खोपोली पोलीस ठाणे गाठावे लागले. अचानक रात्री साडेदहाच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांचा ताफा आल्यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. खोपोली विश्रामगृहाच्या दुरवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रिटिशांनी मुंबई-पुणे महामार्ग तयार करताना बोरघाटाचा अवघड टप्पा, खंडाळा बोगदा तयार करताना मुक्कामासाठी खोपोलीची निवड केली होती. त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना विश्रांतीसाठी डाक बंगला तयार करण्यात आला होता. याच डाक बंगल्याचे आता शासकीय विश्रामगृह झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे. विश्रामगृहाचा परिसर पूर्णपणे पालापाचोळा आणि कचऱ्याने भरून गेला आहे. अडीच एकराच्या जागेत असलेल्या या वास्तूसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षारक्षकही ठेवले नाहीत.
अजित पवारांनी पुढे खोपोलीत शासकीय विश्रामगृह बघून फ्रेश होण्यासाठी वाहनांचा ताफा थांबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार गाड्या शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने गेल्या. हे विश्रामगृह बंद असल्यामुळे पवार यांची मोठी पंचायत झाली. त्यानंतर त्यांनी रात्री साडेदहा वाजता थेट खोपोली पोलीस ठाणे गाठले. उपमुख्यमंत्री अचानक आल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.