
कांदा व दुधाच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले ‘शेतकरी आक्रोश आंदोलन’ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा खासदार लंके यांनी केली.
रविवारी दुपारी पालकमंत्री विखे यांनी अकोले तालुक्यातील गणारे येथे पत्रकारांशी बोलताना विखे यांनी खासदार नीलेश लंके यांना भेटण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर रविवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पालकमंत्री विखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर विखे यांनी आंदोलनस्थळी येत लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काही काळासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा खासदार नीलेश लंके यांनी केली.
मागण्यांवर सकारात्मक विचार – विखे
शेतकऱयांसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. नगर जिह्याचे खासदार म्हणून नीलेश लंके हे शेतकऱयांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. याला राजकीय वळण देण्याची माझी भूमिका नाही. शेतकऱयांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्यांच्या मागण्यांचा सरकार निश्चित विचार करेल. खासदार लंके यांनी केलेल्या मागण्या रास्त असून, यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
शेतकऱयांच्या हाती काहीतरी मिळाले तरच आमचे समाधान – खासदार लंके
कांद्याची निर्यातबंदी उठविल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र, कायमची निर्यातबंदी उठवा, अशी आमची मागणी आहे. त्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न केंद्र शासनाकडे मांडण्याची ग्वाही विखे यांनी दिली. दूध दरवाढीबाबत उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरविले जावेत, ही आमची मागणी आहे. त्यावर कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली, त्यासाठी त्यांनी अवधी मागितला आहे. दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी आम्ही केली. सध्या अधिवेशन सुरू असून, त्यात शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही विखे यांनी दिली. विखे यांनी घेतलेल्या मुदतीपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱयांच्या हाती प्रत्यक्ष काही पडल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.