गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा सण. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 ते 17 सप्टेंबरदरम्यान 4300 जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे.  येत्या 7 सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाडय़ा कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.