भाजपची महाराष्ट्राला द्वेषपूर्ण वागणूक; नागरी उड्डान मंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी देशाचे उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजारापू यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी पालघरमधील प्रस्तावित विमानतळ, छत्रपती संभाजीनगर विमानतळ व नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणाच्या रखडलेल्या मुद्द्यांवर लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या पत्रातून त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण वागणूकीचा देखील समाचार घेतला.

”प्रथम मी तुमची नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करतो. एनडीएमध्ये तुमच्या पक्षाच्या उपस्थितीमुळे आम्ही आता प्रशासनामध्ये अधिक समावेशक आवाज शोधत आहोत आणि विश्वास आहे की एनडीए सरकारमधेही लोकशाहीचे रक्षण केले जाईल. ज्या मुद्द्यांवर मी तुमच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करतोय ते फार सामान्य आहेत तरीही महाराष्ट्राप्रती भाजपच्या द्वेषामुळे गेली 4 वर्षे प्रलंबित आहेत. सरकारने आपल्या कार्यकाळात दोन विमानतळांचे नामकरण केले आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला “छत्रपती संभाजी महाराज विमानतळ” असे नाव देण्यात आले आणि नवी मुंबईत येणाऱ्या नवीन विमानतळाला “दी. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव देण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली, परंतु महाराष्ट्रविरोधी असलेल्या भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. आम्ही पालघर जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याबाबतही प्रस्ताव दिला. जे मुंबई महानगर प्रदेशासाठी तिसरे विमानतळ असू शकते. ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहू वाहतुकीमध्ये प्रदेश आणि हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीला आधार मिळेल. या प्रस्तावाकडेही वारंवार विनंती करूनही भाजपने दुर्लक्ष केले. तुम्ही एक मजबूत प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात आणि राज्यांच्या भावना समजून घेऊ शकता, आशा आहे की आमच्या नम्र विनंत्या स्वीकारून महाराष्ट्र राज्याला योग्य सन्मान द्याल, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहले आहे.