रेल्वेचे माहित नाही मात्र रेल्वे मंत्र्यांना नक्कीच ‘सुरक्षा कवच’ आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

मंगळवारी सकाळी हावडा-मुंबई एक्सप्रेसचे झारखंडमध्ये 18 डब्बे रुळावरून घसरले असून या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जखमी झाले आहेत. हा या महिनाभरातील दुसरा रेल्वे अपघात आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या अपघातांची मालिका थांबत नाहीए. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्र्यांना व भाजपला फटकारले आहे.

”रेल्वेचे माहित नाही पण रेल्वे मंत्र्यांना मात्र नक्कीच ‘सुरक्षा कवच’ आहे. त्यांच्या कार्यकाळात अपघातांच्या मालिका थांबत नाहीएत तरिही त्यांना पदावरून हटवले जात नाहीए. दर आठवड्याला एक तरी अपघात होतोय व त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्या मंत्र्यांना महाराष्ट्राच्या निवडणूकीचा भाजपचा प्रभारी बनवलं जातं. त्यामुळेच ते त्यांच्या मंत्रालयावर लक्ष देत नसावेत का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून केला आहे.