भाजपचे भ्रष्टाचारी सरकार महाराजांना देखील सोडत नाही, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राजकोट किल्ल्यावर पाहणी करायला गेले होते. त्यावेळी नारायण राणे व त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी राजकोट किल्ल्यावर येत गोंधळ घातला. त्यांच्या त्या गोंधळाला शिवसैनिकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात काही घडलं तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असा इशारा देखील दिला.

”इथे बोलण्यासारखे शब्दच नाही. पुतळ्यामध्ये भाजपवाले चोरी भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या आकलनाबाहेर आहे. तरी देखील त्यांनी ते करून दाखवले आहे. हे व्हायलाच नको होते. जगभरात असे अनेक पुतळे आहेत जे समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा गेट वे ऑफ इंडियाला पुतळा आहे. हा जो जदीप आपटे आहे तो कुठे आहे? 24 वर्षाच्या मुलाला कुणी कॉन्ट्रॅक्ट दिलं? त्याला पळून जायला मदत कुणी केली? या प्रश्नांची उत्तर यांनी द्यावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.