मुंबई पोलिसांवर आली खड्डे बुजवण्याची वेळ, आता कुठे गेले मिंधे सरकारचे कंत्राटदार मित्र? आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

मुंबईच्या रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रिटीकरण आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून कंत्राटदारांची नियुक्ती मुंबई महापालिकेने केली आहे. मात्र, मुंबईत पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण केली असून या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम मुंबई पोलीस करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चांगले रस्ते बनवण्याचे आणि त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांचे असताना पोलिसांना खड्डे बुजवावे लागत आहेत. आता कुठे गेले मिंधे सरकारचे कंत्राटदार मित्र, असा संताप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम मुंबई पोलिसांचे आहे. नेमून दिलेल्या वेळेपेक्षा कितीतरी अधिक तास आपले कर्तव्य बजावतात. कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानून मुंबई पोलीस कर्तव्यात कधीच कसूर करत नाहीत. मात्र, सर्वाधिक श्रीमंत असलेल्या महापालिकेच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तातडीने हे खड्डे बुजवण्याचे काम करणे आवश्यक असताना मुंबई पोलिसांना आपले कर्तव्य सोडून कंत्राटदाराची कामे करावी लागत आहेत. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. मिंधे सरकारच्या कार्यकाळात रस्त्यावरील रस्ते बुजवण्याचे काम हे कंत्राटदार किंवा कंत्राटदार कंपनीचा मालक करताना आपल्याला एकदा तरी पाहायला मिळाला आहे का, असा परखड सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला धारेवर धरले आहे.

काय आहे व्हिडीओत…

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ उपनगरातील असून रस्त्यावर पडलेल्या एका तलावाएवढा मोठा खड्डा बुजवण्याचे काम तीन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना खाकी वर्दीत करत आहेत. भरपावसात हे काम सुरू आहे. एक पोलीस शिपाई हातात छत्री घेऊन दोन सहकाऱयांना मार्गदर्शन करतोय, तर दोघे कर्मचारी थेट रस्त्यावर ओतून ठेवलेली खडी फावडय़ाने खेचून खड्डा भरण्याचे काम करत आहेत. आजूबाजूला रस्त्यावर वाहनांची ये-जा, हॉर्नचा आवाज, गोंधळ-गडबड सुरू आहे आणि ही ये-जा सुरू असताना पायातले बूट काढून पँट वर करून हे दोन शूर शिपाई अपघात होऊ नये यासाठी वेगळ्या प्रकारेच कर्तव्य निभावत आहेत.