
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकमधील संबंध विकोपाला गेलेले असताना पाकिस्तानच्या तुरुंगातील 193 भारतीय मच्छीमारांचे काय होणार या चिंतेने कुटुंबियांना ग्रासले आहे. यात महाराष्ट्रातील 18 मच्छीमारांचा समावेश आहे.
आपले नातेवाईक पाकिस्तानच्या तुरुंगातून कधी परत येणार याची चिंता त्यांच्या नातेवाईकांना लागली आहे. 193मध्ये महाराष्ट्रातील 18 मच्छीमार, आदिवासींचा समावेश आहे. या 18 जणांची शिक्षा 2022-23मध्येच पूर्ण झाली आहे. त्यांची राष्ट्रीयतादेखील भारताने नक्की केली आहे. तुरुंगात असलेल्या मच्छीमारांची पाकच्या तावडीतून सुटका होईल या दृष्टीने पावले उचलावी, अशी कळकळीची विनंती नातेवाईकांनी सरकारला केली आहे. आताच्या परिस्थितीत त्यांना कराचीच्या मलीर तुरुंगात अत्याचार सहन करावा लागेल, याचीही त्यांना चिंता आहे.
केंद्र सरकारला आर्जव
सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांनी एक्स या समाजमाध्यमावर संदेश देत, 193 मच्छीमारांची सुटका करण्याकरिता विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केली आहे.