
आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. मात्र, रविवारी (दि. 27) रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणाऱ्या लढतीत जो संघ जिंकेल, तो अव्वल स्थानावर विराजमान होणार आहे.
विराट कोहली सध्या सुपर फॉर्मात असल्याने बंगळुरूच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मागील लढतीत अनुभवी लोकेश राहुलने तुफानी फलंदाजी करीत बंगळुरूच्या घशातून सामना खेचून आणला होता. त्यामुळे या परतीच्या लढतीत दिल्लीला हरवून पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळुरूला सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे.
उभय संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले असून, त्यात दिल्लीने 12, तर बंगळुरूने 19 लढती जिंकल्या आहेत. एक लढत अनिर्णित राहिली होती. म्हणजेच आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूचे पारडे जड आहे. त्यामुळे कोणता संघ कोणाची शिकार करून गुणतक्त्यात नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान होणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.