पत्नी हरविल्याची तक्रार देणारा पतीच निघाला खुनी

इंदापूर तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. पत्नीचा खून करून मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव घाटात दीडशे फूट खोल दरीमध्ये फेकला होता. तसेच पत्नी हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र, तीन महिन्यांनंतर पोलिसांनी ज्योतीराम करे आणि त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा 2013 मध्ये कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी विवाह झाला होता. काही महिन्यांपासून ज्योतीराम करे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये वाद होत होते. 29 जानेवारी 2025 रोजी ज्योतीरामने इंदापूर पोलिसांत पत्नी हरविल्याची तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. ज्योतीराम सातत्याने पोलिसांना खोटी माहिती देत होता. संशय बळावल्याने पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगरघाटात पोहोचले. तेथे प्रियंकाचा सांगाडा पोलिसांना सापडला. त्यावेळी पतीच खुनी असल्याचे समोर आले आहे.