संस्कृती-बिंस्कृती- मासिक पाळी आजही घृणास्पदच?

>> डॉ. मुकुंद कुळे

एकीकडे मुलीला मासिक पाळी सुरू झाली की ती स्त्री झाली, वयात आली म्हणून सोहळे व उत्सव केले जातात. मुलीला सजवून, झोपाळ्यावर बसवून अगदी तिची साग्रसंगीत ओटी भरली जाते. कुणाला ते पूर्वीचे मुलगी ऋतुमती झाल्याचे सोहळे पाहून किंवा तेव्हाची वर्णने वाचून वाटावे की, किती तो स्त्राrचा आणि तिच्या मातृत्वशक्तीचा सन्मान. पण प्रत्यक्षात तो सन्मान असतो तिच्या प्रसवा होण्याचा, ती आता मूल जन्माला घालू शकणार याचा. तिच्या स्त्राrत्वाचा, मातृत्वाचा वा सर्जनशीलतेचा नाही. अन्यथा याच समाजाने स्त्राrच्या मासिक पाळीचा आणि ऋतुस्त्रावाचा सन्मान नसता का केला? हा सन्मान स्त्रीच्या आणि तिच्या मासिक पाळीच्या वाटय़ाला अजून आलेला नाही. आजही मासिक पाळीबद्दलची समाजाची मानसिकता बदललेली नाही, अन्यथा तामीळनाडूमधील शाळेत मुलीला वर्गाबाहेर बसून परीक्षेचा पेपर लिहावा लागला नसता.

अगदी आताची गोष्ट तामीळनाडूत घडलेली. एका खासगी शाळेत आठवीतल्या मुलांची वार्षिक परीक्षा सुरू होती. या परीक्षेच्या दरम्यान बाकीचे सर्व विद्यार्थी वर्गात बाकावर बसून पेपर सोडवण्यात व लिहिण्यात गर्क असताना एक विद्यार्थिनी मात्र वर्गाबाहेर दाराजवळ बसून पेपर लिहीत होती. त्याचं कारण तिला विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. ती म्हणाली, “मासिक पाळी सुरू असल्यामुळे शिक्षकांनीच मला उत्तरपत्रिका लिहायला वर्गाबाहेर बसवलं आहे.’’

आजच्या 21 व्या शतकात नाही तर मध्ययुगात शोभेल असंच हे शिक्षकांचं आणि त्या शाळेचं वागणं आहे. विशेष म्हणजे सतत दोन दिवस बाहेर बसूनच मुलीला पेपर लिहायला लागल्याने त्या मुलीची संतापलेली आई तिसऱया दिवशी तिच्यासोबत शाळेत आली. तेव्हा कुठे या प्रकाराला वाचा फुटली. नाहीतर आजही समाजात अशा घटना घडतच असतात आणि समाज परंपरा म्हणून त्याकडे सहज दुर्लक्ष करून मोकळा होतो. तामीळनाडूतील शाळेत घडलेली ही घटना म्हणजे स्त्राrच्या मासिक पाळीकडे समाज अगदी आजही किती घृणेने बघतो, त्याचंच उदाहरण आहे.

अशाच प्रकारची एक घटना दोनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली होती. मासिक पाळी सुरू होती म्हणून आपल्याला वृक्षारोपण करू दिलं नाही असा आरोप एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांवर केला होता. अर्थात तो आरोप खोटा असल्याचं नंतर झालेल्या चौकशीत निष्पन्न झालं. मात्र त्यानिमित्ताने संबंधित मुलीने जो बनाव रचला होता तो समाजाच्या मध्ययुगीन मानसिकतेवर प्रकाश टाकणारा होता. सर्वप्रथम या गोष्टीला वाचा फुटताच तेव्हा संपूर्ण राज्यभरातून या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. किंबहुना या घटनेची चौकशी करून संबंधित शिक्षकावर त्वरित कारवाई करण्याचे सरकारी आदेशही निघाले, परंतु प्रत्यक्ष चौकशीत असं काही घडलंच नसल्याचं कळलं. वर्गात सतत गैरहजर राहिल्यामुळे शिक्षक ओरडतील आणि आपल्याला शिक्षा करतील या भीतीतून त्या मुलीनेच शिक्षकाच्या विरोधात कुभांड रचल्याचं समोर आलं. परिणामी या प्रकरणातील हवाच निघून गेली, जणू काही मासिक पाळी आणि त्या काळात महिलांना देण्यात येणारी निंदनीय वागणूक हा आपल्याकडे कधी वादाचा, चर्चेचा विषयच नव्हता. प्रत्यक्षात स्त्रियांची मासिक पाळी हा आजही अनेकांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ाही अतिशय घृणेचा विषय आहे.

समाजाच्या मानसिकतेत मासिक पाळीच्या संदर्भात जर सकारात्मक बदल झाला असता तर कदाचित त्या आदिवासी मुलीने खोटंनाटं का होईना मासिक पाळीचं कारण सांगितलंच नसतं. मात्र तसं न करता ज्याअर्थी तिने बिनदिक्कत, “ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेलं झाड जगणार नाही,’’ अशी सूचना शिक्षकांनी केल्याचं खोटंच सांगितलं, त्याअर्थी महिलांच्या मासिक पाळीकडे आजही आपला समाज मोकळेपणाने बघत नाही, हे तिला पुरतं ठाऊक होतं. म्हणूनच तिने मासिक पाळीचं भांडवल केलं.

वास्तविक मासिक पाळी हा स्त्रियांचा निसर्गधर्म आहे आणि दर महिन्याला येणारा तो सर्जनाचा उत्सवही आहे. अर्थात हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक महिन्याला स्त्राrला तना-मनाचा स्वाहाकार करावा लागतो हे खरंच. तिची इच्छा असो वा नसो, निसर्गाचा हा नेम काही चुकत नाही. जेव्हा तिच्या शरीरातून या चार दिवसांत लाल, काळा, निळा स्त्राव वाहून जातो, तेव्हाच तिच्या ओटीपोटात सर्जनाची लाख फुलं उमलतात. फळधारणेसाठी आसुसतात. याचाच अर्थ स्त्रियांचा ऋतुस्त्राव म्हणजे काही स्त्राrला अस्पर्श्य, अपवित्र करणारा घटक नाही. उलट पुरामुळे नदी जशी अंतर्बाह्य घुसळून निघते, तिचं पाणी गढूळ होतं. मात्र कालांतराने तेच पाणी निवळल्यावर नदी आरस्पानी जीवनदायिनी होतं. ऋतुस्त्रावही तसाच जीवजन्माचं दान देणारा आणि म्हणूनच पवित्र नि सर्जनशील आहे. तरीही अगदी आदिमकाळापासूनच मानवाला या ऋतुस्त्रावाचं भय वाटत आलेलं आहे. निसर्गाची कोडी न सुटलेल्या त्या आदिमकाळात स्त्राrच्या जांघेतून अचानक वाहू लागणाऱया या लाल, काळ्या, निळ्या स्त्रावाचं त्यालादेखील सर्वप्रथम भयच वाटलं. काहीतरी अद्भूत निसर्गतत्त्व या स्त्रावाच्या ठिकाणी आहे हे त्याने जाणलं आणि म्हणूनच आदिमकाळातील अनेक यात्वात्मक (जादूटोण्यासदृश्य) क्रियांमध्ये स्त्रियांच्या मासिक धर्मातील स्त्रावाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी स्त्राrदेहातून वाहणारा हा लाल, काळा, निळा स्त्राव म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारक अशा दोन्ही शक्ती असलेला चैतन्यतत्त्व होता. यामुळेच तर आदिमकाळातील पुरुष स्त्राrपुढे कायम दबलेलाच राहिला.

नंतरच्या मानवी विकसनाच्या प्रक्रियेत मात्र मानवाला निसर्गाची कोडी सुटत गेली. त्यातही पुरुषाला निसर्गत आपल्या ठायी असलेल्या शक्तीची जाणीव झाली आणि मुख्य म्हणजे त्याने अनुभवाने बीज-क्षेत्र न्याय प्रस्थापित केला. म्हणजेच स्त्राrचं गर्भाशय हे क्षेत्र म्हणजे जमीन असून जर आपण त्यात आपलं (पुरुषाचं) बीज पेरलं नाही, तर त्यातून काही उगवणारच नाही याची त्याला जाणीव झाली आणि एकप्रकारे तो स्त्राrला दुय्यम लेखू लागला; केवळ स्त्राrलाच नाही तर ज्यामुळे गर्भधारणेसाठी आवश्यक अशी भूमी तयार होते, त्या ऋतुस्त्रावालादेखील. विशेष म्हणजे केवळ दुय्यमत्व देऊन तो थांबला नाही, तर त्याने हा ऋतुस्त्राव म्हणजे नरकातली (आता तो नरक कुणी पाहिलाय कोण जाणे) घाण मानली. सर्जनशील असलेल्या स्त्रावाला तो विटाळ मानू लागला आणि त्या मासिक धर्माच्या काळातील स्त्राrला त्याने अस्पर्श्य, अपवित्र ठरवली. केवळ पुरुषांनीच लिहिलेल्या आपल्या धर्मग्रंथांनीही तेच प्रमाण मानलं आणि सांगितलंही. परिणामी तेच परंपरेचं जोखड आपण अद्याप आपल्या खांद्यावर वागवत आहोत.

हे जोखड आपल्या खांद्यावरून आपण आता तरी उतरवलंय का? तर याचं उत्तर शंभर टक्के ‘हो’ असं कधीच येणार नाही. कारण कसलाही आगापिछा ठाऊक नसलेला परंपरेचा गाडा जसाच्या तसा खांद्यावर वागवायला आपल्याला आवडत असतं. आजही देशभरातील विविध मंदिरांत स्त्रियांना मासिक धर्माच्या काळात प्रवेश दिला जात नाही. शुभकार्यप्रसंगी त्यांचा वावर निषिद्ध मानला जातो. अगदी एखाद्या बहरलेल्या झाडाला स्पर्श करायलाही त्यांना मासिक पाळीच्या काळात बंदी घातली जाते. मग शनी शिंगणापूरच्या शनीच्या ओटय़ावर चढण्यास स्त्रियांना बंदी म्हणून स्त्रियांनाच आंदोलन करावं लागतं. एवढंच कशाला दिवंगत कवयित्री, लेखिका शांताबाई शेळके आळंदीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. तेव्हा आळंदीतील प्रसिद्ध अजानवृक्षाच्या ओटय़ावर पुरुषांप्रमाणेच बसून पोथी वाचायला मिळावी म्हणून महिलांना आंदोलन करावं लागलं होतं. तेव्हा कुठे महिलांना त्या ओटय़ावर चढण्याची आणि तिथे पोथी वाचण्याची संधी मिळाली होती. महिलांना ती मुभा अजून आहे की नाही ठाऊक नाही. कारण एखाद्या चुकीच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला, की तेवढय़ापुरती मुभा दिली जाते. मात्र, आंदोलनकर्त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे सुरू राहतं.

भारतीयांची एक गंमत बघा, आता काळाच्या ओघात स्त्रिया शिकल्यात, वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवतायत, प्रसंगी पुरुषालाही मागे टाकून पुढे धावतायत. परिणामी त्यांचं त्यांनीच आपल्या मासिक पाळीचा बाऊ करणं आता सोडून दिलंय. म्हणजे त्या चार दिवसांत त्यांना दुखतं-खुपतंच. त्या काळात जरा निवांतपणा मिळाला तर त्यांना तो हवाही असतो, पण म्हणून त्या काही घरी बसत नाहीत. तसंही पूर्वी ज्या कष्टकरी महिला होत्या, त्या कधीच मासिक पाळीच्या दिवसांत घरी थांबलेल्या, बसलेल्या नव्हत्या. कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसतानाच्या त्या काळात या महिला या मासिक शरीरधर्माला कशा सामोऱया गेल्या असतील कोण जाणे.

आता काळ बदललाय खरं, पण मासिक पाळीबद्दलची समाजाची मानसिकता बदललीय का? ती जर खरोखरच बदलली असती तर खोटं म्हणून का होईना, पण मासिक पाळीचं कारण पुढे करण्याची वेळ नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्या मुलीवर आली नसती आणि तामीळनाडूतल्या त्या मुलीलाही वर्गाबाहेर बसून परीक्षेचा पेपर लिहावा लागला नसता.

[email protected]

(लेखक लोककला, साहित्य, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत.)