अपील करण्याआधीच पंचांनी बोट वर केलं, आऊट न होताच ईशान किशन तंबूत परतला; MI vs SRH लढत अन् फिक्सिंगची चर्चा!

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सामना रंगला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासून मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत हैदराबादच्या विस्फोटक फलंदाजांना वेसण घातले. त्यामुळे हैदराबादचा संघ 20 षटकात 8 बाद 143 पर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर हे आव्हान मुंबईने रोहित शर्माच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर पूर्ण केले. मात्र या लढतीत हैदराबादचा डावखुरा फलंदाज ईशान किशन ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे सोशल मीडियावर फिक्सिंगची चर्चा सुरू झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

यंदाचा हंगाम सुरू होण्याआधी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने 300 धावांचे टार्गेट ठेवले होते. पहिल्या लढतीमध्ये हैदराबादचा संघ जवळपास या टार्गेटपर्यंत पोहोचलाही होता. मात्र त्यानंतर 200 धावा गाठतानाही हैदराबादची दमछाक होऊ लागली. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश रेड्डी, हेनरीक क्लासन यासारखे तगडे फलंदाज असतानाही हैदराबादचा संघ गटांगळ्या खात आहे. बुधवारी मुंबईविरुद्ध घरच्या मैदानावरही हैदराबादचा संघ ढूस झाला.

वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याने सलामीवीर ट्रेव्हिस हेड याला नमन धीर करवी झेलबाद केले. त्यानंतर ईशान किशन मैदानात उतरला. तिसऱ्या षटकात तो देखील 2 धावांवर बाद झाला. मात्र त्याची विकेट वादाचे कारण ठरले. दीपक चहरचा लेग साईडला वाईड जाणारा चेंडू ईशान किशनच्या बॅटच्या जवळून गेला आणि मागे यष्टीरक्षक रिकलटन याने तो टिपला. या चेंडूवर गोलंदाज आणि यष्टीरक्षकाने अपील केले नाही, मात्र कव्हर्सवर उभ्या कर्णधार हार्दिक पंड्याने हलकेसे अपील केले. आधी मैदानावरी पंच चेंडू वाईड देण्याच्या तयारीत होते, मात्र ईशान किशन तंबूकडे चालू लागल्याने पंचांना बोट वर करत त्याला बाद दिले.

दुसरा चेंडू टाकण्यासाठी माघारी येत असताना पंचांनी बोट वर केल्याचे पाहताच दीपक चहरने अपील केले. त्यानंतर किशन तंबूमध्ये परतला. मात्र यानंतर रिप्लेमध्ये बॅट आणि चेंडूमध्ये संपर्कच झाला नव्हता हे दिसून आले. त्यामुळे फिक्सिंगची चर्चा जोर धरू लागली. सोशल मीडियावरही या सदर्भात ट्विट वर ट्विट पडू लागले. माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनीही ईशानच्या विकेटवरून एक ट्विट केले आहे.