राज्याकडून गिरीश महाजन तिथे असताना इतरांनी जाण्याची गरज नव्हती; संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले

संकटाच्या काळात देश एकत्र आहे, हे दाखवणे गरजेचे असते. त्यामुळे सरकार जी भूमिका घेईल किंवा जो निर्णय घेईल, त्याच्या पाठिशी आम्ही विरोधी पक्ष ठामपणे उभे आहोत. याबाबत कोणतेही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेण्याचे कारण नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एक देश म्हणून आता सरकारसोबत राहण्याची गरज आहे. मात्र, विरोधी पक्ष सरकारसोबत असताना महायुतीतील घटक पक्ष श्रेयवादासाठी धडपडत असल्याचे दिसते. अशा घटनांमुळे ते राज्याचे हसे करत आहेत, असे स्पष्ट करत संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीरला गेल्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, या काळात सरकार म्हणून समन्वयाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असते. राज्य सरकारकडून गिरीश महाजन यांना कश्मीरला पाठवल्यानंतर इतर कोणी तिथे जाण्याची गरज नव्हती. मात्र, काहीजण गरज नसताना तिथे गेले आणि राज्य सरकारमध्ये एकमत नाही, मतभेद आहे, हे दाखवून दिले. या संकटाच्या काळात आम्ही आणि सर्व विरोधी पक्षांनी सरकारसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्ष श्रेयवादासाठी राज्याचे हसे करून घेत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्यातील काही पर्यटक तेथे अडकले आहेत. काहीजण जखमी आहे. अशावेळी सरकारकडून वन विंडो सिस्टिम असण्याची गरज आहे. राज्याकडून एका सक्षम आणि अनुभवी व्यक्तीला पाठवण्यात आले आहे. ती व्यक्ती सर्व सांभाळत आहे. असे असतानाही मिंधे तिथे गेले, ते समांतर सरकार चालवत आहेत काय? ते मुख्यमंत्र्यांचे ऐकायला तयार नाही. अशी परिस्थिती दुर्दैवी आहे. अशी कठीण प्रसंगात कोणीही अशी भूमिका घेणे अयोग्य आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी मिंध्यांना योग्य ते आदेश देण्याची गरज आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आमच्या मनात, कश्मीरबाबत, देशाच्या सुरक्षेबाबात, गृहमंत्र्यांच्या क्षमतेबाबत अनेक प्रश्न शंका आहेत. मात्र, एक राष्ट्र म्हणून या काळात आम्ही सरकारसोबत आहेत आणि काहीजण श्रेयवादाच्या मागे लागले आहेत. ही वेळ मतभेद व्यक्त करण्याची नसून राष्ट्र एक आहे, हे दाखवण्याची वेळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कश्मीरमधील घटनेने प्रत्येक नागरिकांचा संताप झाला आहे. त्यामुळे घटनेनंतप आपली संतप्त भूमिका होती. मात्र, एक देश म्हणून भूमिका घेण्याची आमची भूमिका आहे. आता आम्ही सांमजस्याची आणि देशहिताची भूमिका घेतली आहे. आपली लढाई पाकिस्तानशी, दहशतवाद्यांशी आहे. भाजपशी संबंधित काहीजण या मुद्द्यावर देशात आणि राज्यात हिंदु-मुस्लिम राजकारण करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. कश्मीरमधील पर्यटकांनी मुस्लिम बांधवांनी केलेली मदत विसरता येणार नाही. त्यामुळे भाजपने अशाप्रकराचे राजकारण करू नये आणि गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे, असे आमचे आवाहन आहे.