पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आता या हल्ल्यातील नवनवीन अपडेट सातत्याने समोर येत असून हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्र संतापाचा लाट उसळली आहे. यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत सरकावर टीका केली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पाकिस्तानबाबत मोठे विधान केले आहे. पहलगाम हल्ला हा निव्वळ वेडेपणा आहे, असे ते म्हणाले.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा हल्ला एक सुनियोजित कट होता. बैसरन व्हॅली पहलगामपासून थोडे वरच्या दिशेला आहे. त्यामुळे तिथे कार आणि इतर वाहतुकीची साधने पोहोचू शकत नाहीत. तिथे फक्त घोडे आणि खेचरच पोहोचतात. त्यामुळे हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना तिथे पोहोचण्यासाठी बराच वेळ लागेल हे माहित असल्याने दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी बैसारण खोऱ्याची निवड केली. कारण सुरक्षा दलांचे अधिकारी पोहोचेपर्यंत दहशतवादी सहज पळ काढू शकतात, असे ते यावेळी म्हणाले.

दहशतवाद्यांनी पुरुष आणि महिलांना वेगळे केले, हे देखील काळजीपूर्वक विचार करून केले. हल्ल्याच्या एक आठवडा आधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी केलेल्या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही आमच्या कश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात सोडणार नाही… अशी विधाने त्यांनी केली होती. मी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करू इच्छितो की या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवावा. पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे. मला खात्री आहे की, विरोधी पक्ष याला पाठिंबा देईल, असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले असीम मुनीर?

आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, ही आमची मानेची नस होती, आमच्या मानेचीच नस राहील. आपण हे विसरणार नाही. आम्ही आमच्या कश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात सोडणार नाही. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बरेच फरक आहेत. आणि पाकिस्तानी मुस्लिम प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. ‘आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत; आपला धर्म वेगळा आहे, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांनी पाकिस्तानची कहाणी विसरू देऊ नये, असे विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांनी केले.