
>> प्रभा कुडके
पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे, पुन्हा एकदा कश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे, देशासह परदेशातील पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळेच आगामी कश्मीरला टूर घेऊन जाणाऱ्या पर्यटन कंपन्यांवर संक्रात आली आहे. येत्या मे महिन्यात कश्मीर फिरायला जाणाऱ्यांची संख्या आता चांगलीच रोडावताना दिसत आहे. कश्मीरला जाण्यासाठी केलेली बुकिंग रद्द करण्याकडे पर्यटकांचा कल दिसत आहे. झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने पर्यटन क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. यामुळेच आता कश्मीरच्या पर्यटनक्षेत्रावर अवलंबून असलेल्यांना चांगलाच फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता कश्मीरमधील स्थानिक टूर आॅपरेटर्स सुद्धा चिंताग्रस्त झाले आहेत.
काश्मीर पर्यटनाच्या सद्यस्थितीविषयी बोलताना, विहंग टुर्सचे संचालक मकरंद जोशी म्हणतात, झालेल्या या हल्ल्यामुळे आगामी दोन ते तीन महिन्यांच्या काश्मीर टुर्सचे बुकिंग रद्द करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. त्यामुळे आगामी काश्मीर टूरबद्दल सर्वच टूर आॅपरेटर आता साशंक झालेले आहेत. टूर रद्द करायला येणारे पर्यटक पैसे फुकट गेले तरी, चालतील पण काश्मीरला जायला नको असे म्हणत आहेत. नैसर्गिक आपत्ती आल्यास, पर्यटक फार घाबरत नाहीत. परंतु दहशतवादी हल्ला आणि तोही पर्यटकांवर झालेला हा हल्ला असल्यामुळे, सध्याच्या घडीला पर्यटक काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यासाठीच येत आहेत.
सध्याच्या घडीला मे महिन्यात कश्मीरला पर्यटनाला जाणाऱ्या बहुतांशी पर्यटकांनी कंपन्यांकडे सहलीचे बुकिंग रद्द करण्यासाठी धाव घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती. परंतु सध्या झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे, हिंदुस्थानातील अनेक पर्यटन कंपन्या आता चिंताग्रस्त झालेल्या आहेत. आगामी कश्मीर पर्यटनाला जाणाऱ्यांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी कंपन्यांकडे तगादा लावलेला आहे. पैसे बुडाले तरी, चालतील पण आता कश्मीरला जायला नको, अशी अनेक पर्यटकांची भावना दिसून येत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कश्मीरचे पर्यटन हे दिवसागणिक बहरत चालले होते. त्यामुळेच कश्मीरमधील स्थानिक पर्यटन कंपन्यांमध्ये, तसेच तिथल्या पर्यटनावर अवलंबून असलेले रोजगार दिवसागणिक वृद्धींगत होत होते. परंतु या दहशतवादी हल्ल्यामुळे मात्र, स्थानिक हाॅटेल व्यावसायिक आणि इतर पर्यटनाशी निगडीत व्यवसायांवर मोठे संकट आले आहे.