चंद्रपूरात विविध वॉर्डात भीषण पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा सुरू

सुमारे बाराशे ते चौदाशे मिलिमीटर वार्षिक पर्जन्यमान असलेल्या चंद्रपुरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. चंद्रपूर शहर मनपा शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वॉर्डातही टँकरने पाणीपुरवठा करत आहे. शहराचा पाणीपुरवठा इरही धरण आणि इरई नदी या दोन स्त्रोतांमधून होतो; मात्र अमृत पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा संथ गतीने राबविला जात असल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराच्या अनेक भागात बोरवेल तळाला गेल्या आहेत. परिणामी नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मनपाच्या आठ व खाजगी चार अशा बारा टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यासह अन्य भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. वॉर्डांमध्ये 180 टँकर फेऱ्याद्वारे तहान भागविली जात आहे. शहराच्या एकूण 90 ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. असे असले तरी शहरात पाणीटंचाई आहे हे मानायला प्रशासन तयार नाही. नागरिक मात्र कधी मनपाच्या टँकरची वाट बघत तर कधी पैशाने पाणी विकत घेत आला दिवस पुढे ढकलत आहेत. प्रशासनाकडे यावर उत्तर नाही.