
लेखक अतुल देऊळगावकर यांच्या ‘शशिकांत अहंकारी ः दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाचे साधना प्रकाशनातर्फे आज पुण्यात प्रकाशन होत आहे. पुस्तकाला माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.
शशिकांत अहंकारी डॉक्टरच झाले नसते, तर काय झाले असते? किंवा त्यांना शुभांगीचा सक्रिय सहभाग आणि सहवास लाभला नसता, तर त्यांच्या जीवनाने कसा आकार घेतला असता? डॉक्टर होऊनही ते या प्रकारच्या; विशेषत स्त्रियांच्या बाळंतपणाच्या, गर्भपाताच्या, विशिष्ट शारीरिक व्याधींच्या निवारणासाठी रुग्णसेवेच्या कार्यात उतरले नसते तर?
हे प्रश्न तसे अतार्किक वा अनुचितही वाटू शकतील. पण ते असंयुक्तिक नाहीत. कारण, शशिकांत यांनी ज्या काळात हे व्रत स्वीकारले, त्या काळात सर्वसाधारण प्रभाव होता वैयक्तिक महत्त्वाकांक्षांच्या मानसिकतेचा. लौकिक यश प्राप्त करण्यासाठी झटण्याचा, वा अलीकडच्या लोकप्रिय
मॅनेजमेंट थिअरीनुसार ‘किलर इन्स्टिक्ट’ अंगात मुरवून पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, संपत्ती संपादन करण्याचा. शशिकांत युरोप-अमेरिकेतही जाऊन यशस्वी होऊ शकले असते. त्याच्या मध्यमवर्गीय स्तरावरचे सगळेच त्या प्रवृत्तीचे होते असे नव्हे. त्यांच्यातही अनेक सेवाभावी आणि आदर्शवादी तरुण होते. किंबहुना म्हणूनच बाबा आमटे, अभय बंग, डॉ. आरोळे वा वेगळ्या संदर्भात अरुण लिमये, अनिल अवचट आणि नरेंद्र दाभोळकर यांना सहकारी मिळत गेले. तरीही, शशिकांत अहंकारी यांची कहाणी ही कमालीची असामान्य आणि झपाटून टाकणारी आहे.
अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या या संहितेचे वाचन करताना मला सातत्याने डॉ. अल्बर्ट श्वाईट्झरची आठवण येत होती. शशिकांत यांच्यापेक्षा सुमारे 75-80 वर्षे आधी, तत्कालीन सुस्थित जर्मनीत जन्माला आलेल्या अल्बर्टला सुखी समूह जीवनाचे अनेक मार्ग उपलब्ध होते. मुळात तो तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा विद्यार्थी. पण एकदा बायबल वाचताना त्याला येशू ख्रिस्ताच्या वचनांचा साक्षात्कार झाला. ‘दुःखी, आजारी, अशक्त लोकांची सेवा कर. महारोग्यांच्या जखमा स्वच्छ करून त्यांना आधार दे. मरणासन्नांना जीवनदान दे आणि मृत झालेल्यांना मानाने वागव. दुष्ट, विकृत प्रवृत्तींना हटव… तुला हे जीवन न मागता मिळाले आहे. ते तितक्याच मुक्तपणे उपेक्षितांना दे.’
आपल्याला हा जणू येशूने दिलेला आदेश आहे, असे मानून अल्बर्टने मागासलेला, उपेक्षित, गरीब आणि कोणतीही सुविधा नसलेला आफ्रिकेचा प्रदेश निवडला. त्याने त्या तुलनेने समृद्ध असलेल्या युरोपमधून आफ्रिकेच्या मागास भागात (विमानसेवा, टेलिफोन, रेल्वे , कार वा अॅम्ब्युलन्स असे काही नसताना) जायचे ठरवले. त्याने त्याच्या पत्नीसह तेथील लोकांची सेवा, मुख्यत रुग्णसेवा केली. युरोपात जन्म, अतिशय दुर्गम आणि मागास आफ्रिकेत अनेक दशके रुग्णसेवा आणि तरीही आरोग्यापासून जागतिक शांतता, संगीत आणि इतर कलांपर्यंत, जीवनाच्या सर्व अंगांमध्ये विरघळून जाण्याची क्षमता… हे सर्व कुठून येते?
शशिकांत यांचा हा चित्तथरारक आणि मन हेलावून टाकणारा जीवनप्रवास वाचताना नेमका हाच प्रश्न माझ्या मनात आला. अतुल देऊळगावकर यांना दुसऱया व्यक्तीच्या जीवनात परकायाप्रवेश करण्याची विलक्षण कला अवगत आहे. मग ती व्यक्ती कुमार गंधर्व असो, वा लॉरी बेकर, एम. एस. स्वामीनाथन असो, वा महेश एलकुंचवार… तसाच परकायाप्रवेश त्यांनी शशिकांत आणि शुभांगी या दांपत्याच्या आयुष्यक्रमात केला आहे. गावातल्या स्त्रियांची दयनीय अवस्था, त्यांच्या वेदना व व्यथा, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय सहाय्य उपलब्ध नसताना त्या कशा जगतात (वा मरतात) त्याचे हृदयद्रावक चित्र अहंकारी दांपत्याच्या नजरेतून आपल्याला कळते. (म्हणजे तसे वाटते!)
अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक आणि डॉ. अमर्त्य सेन, आरोग्य व शिक्षण यांना केंद्रस्थानी ठेवणारा विकास आवश्यक आहे, यासाठी 1980-90 च्या दशकात आग्रह धरत होते. त्यातून ‘मानव विकास निर्देशांक’ आकार घेत होता. त्याच काळात शशिकांत अनेक खेडय़ांत आरोग्य आणि शिक्षण यांची उत्तम व्यवस्था लावून देत होते. त्याने त्या ओघात ‘हॅलो’ ही महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्यावर व्यापक सकारात्मक परिणाम घडवणारी संस्था आकाराला आणली. वि. स. पागे यांनी 1972 च्या दुष्काळात सुचवलेली ‘रोजगार हमी योजना’ संपूर्ण देशात लागू झाली. त्यानंतर, महाराष्ट्र शशिकांत यांच्यामुळे आणखी एक उत्तम योजना देशाला देऊ शकला. शशिकांत याची गावांना निरामय करणारी ‘भारतवैद्य’ ही योजना भविष्यात भारत सरकारची ‘आशा’ योजना म्हणून आकाराला आली. आज गावागावांतील ‘आशां’नी भारतीय आरोग्यसेवेचा भार पेलला आहे. त्यांच्यामुळे कित्येक आजार गावांतच नियंत्रणात येत आहेत.
शशिकांत-शुभांगीचे अद्वैत कधीही आत्मनैतिकतेच्या अहंगंडाच्या सापळ्यात अडकले नाही तर त्या रोगापासून कायम मुक्त राहिले. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधू इच्छिणाऱयांना (तसेच असे प्रश्न न पडणाऱयांनासुद्धा) या पुस्तकातून अनेक अर्थ (व बोध) गवसणे शक्य आहे.