
ओव्हरटेक करण्याच्या नादात कार ट्रेलरखाली घुसली आणि हसत्या खेळत्या कुटुंबाचा एका क्षणात अंत झाला. राजस्थानमधील जयपूरमध्ये हा भीषण अपघात घडला. या अपघातात इंजिनिअर तरुणासह कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
इंजिनिअर अभिषेक वर्मा हा आपली, सहा महिन्यांची मुलगी आणि आई-वडिलांसह सिकर जिल्ह्यातील तीर्थस्थळी दर्शनाला चालला होता. यावेळी जमवारामगढ येथे मनोहरपूर-दौसा महामार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पुढील गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात वर्मा यांची कार समोरून येणाऱ्या ट्रेलरखाली घुसली.
अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.
दरम्यान, अपघातानंतर ट्रेलर उलटून 20 फूट दरीत कोसळला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून क्लिनरला किरकोळ जखम झाली आहे.