
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली त्या वेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते. महिला शिकली तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता ‘फुले’ चित्रपटातून तो भाग वगळावा असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते पुढे म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की, पूर्वी तसे होत होते, पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही, पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपसाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अतिशुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी केला.