
अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांचे पाप अन् प्रशासनाच्या अपयशामुळे ठाण्याच्या रस्त्यावर, नाल्यात कचऱ्याची अक्षरशः बजबजपुरी झाली आहे. ठाण्यातील कोरम मॉल येथील नाला, कळव्यातील महात्मा फुलेनगर, खारेगाव, भास्करनगर आणि सह्याद्री शाळेजवळील नाल्यात प्रचंड कचरा व गाळ साचलेला आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून कचरा उचलला जात नसल्याने कचरा संकलनाचे व्यवस्थापन संपूर्णपणे कोलमडले आहे. वागळे येथील सीपी तलाव संकलन केंद्रावर कचरा टाकण्याला स्थानिकांनी विरोध केल्याने रस्त्यावर कचरा साचलेला दिसून येत आहे, तर दुसरीकडे नालेसफाईचे काम निविदा प्रक्रियेत अडकले असल्याने शहरातील नालेही ओव्हरफ्लो झाले असून ठाणेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रोगराईतून पालिका प्रशासन ठाणेकरांची सुटका कधी करणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.