परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला विचारला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे. आता तरी फडणवीस सरकार जागे होऊन संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करणार आहे?

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलीसांना व्यवस्थित हाताळता आले नाही. शहरात शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला, त्यात अनेकांना जबर मारहाण झाली. अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला पण सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशानात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली.”