खालापुरात गोवंशाची कत्तल; समाजकंटकांचा पोलिसांवर हल्ला

गाई आणि बैलांची कत्तल करून त्यांचे मांस टेम्पोतून विक्रीसाठी नेणाऱ्या समाजकंटकांना गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी अडवताच हाळ गावातील तब्बल दीडशेहून अधिक समाजकंटकांनी थेट गावकरी आणि पोलिसांवर हल्ला केला. यावेळी गावकरी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. काचेच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या आणि लाठीकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी धरपकड करून बारा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

खालापूर तालुक्यातील हाळ गावाजवळ सागर कॅफे हॉटेलच्या टेम्पोतून दोन बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यावेळी ग्रामस्थांनी हा टेम्पो अडवला असता हे बैल शर्यतीसाठी घेऊन जात असल्याचे टेम्पोतील लोकांनी सांगितले आणि त्यानंतर हे हाळ गावात पळत सुटले. दरम्यान टेम्पोच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात गाईचे मांस व अवयव आढळल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली.

पोलीस घटनास्थळी येताच हाळ गावातील मुस्लिम समुदायाच्या दीडशेहून अधिक हल्लेखोरांनी गावकरी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करत हल्ला चढवला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आणि हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी बारा हल्लेखोरांना अटक केली असून हाळ गावात तणावाचे वातावरण आहे.