
उत्तराखंडचे अर्थ आणि संसदीय कामकाज मंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावं लागलं होतं. यानंतर आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अग्रवाल यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस आमदार मदन बिष्ट यांनी केलेल्या एका टिप्पणीवर प्रेमचंद अग्रवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ‘हे राज्य पहाडी लोकांसाठी बनले आहे का?’ त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. यानंतर विविध संघटना आणि राजकीय विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाढत विरोध पाहून आज अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.