बीडमधील दहशतवाद कधी थांबणार? जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका; अंजली दमानिया यांची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्येची घटना ताजी असतानाच आष्टी तालुक्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथे ट्रक मालकाने चालकाला डांबून ठेवत अमानुष छळ करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विकास बनसोडे असे मयत चालकाचे नाव आहे. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

माध्यमांशी संवाद साधता अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, राज्यातील कायदा सुव्यवस्था कधी जागेवर परत आणणार, हे मृत्यू कसे थांबवणार, ही दहशत कधी थांबवणार? यावर सरकार कधी चर्चा करणार, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, “आज पुन्हा एक मृत्यू झाला आहे, त्याचे चित्र संतोष देशमुख त्यांच्यासारखीच आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता तरी याबद्दल अधिवेशनात काहीतरी सांगावं.”

अंजली दमानिया म्हणाल्या, “बीडमध्ये जी परिस्थिती झाली आहे, त्यासाठी वेगळ्या प्रकारचा कायदा आणावा, कारण आता हे सगळं हाताबाहेर गेलं आहे. तेथील सगळे अधिकारी बदलून टाका”, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.