
इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरिता वापरण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त हा आदेश लागू करण्यात आला आहे.
इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी उपयोगात आणण्यास मनाई करण्यात आली आहे. हे पाणी भांडी घासणे, तसेच अन्य कारणासाठीच केवळ वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. नदीच्या पात्रात कोणतेही कपडे धुवू नयेत. अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल, असे कृत्य करू नये. हे दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिला आहे.