महायुती सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

महायुती सरकारचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. महाराष्ट्रातून मराठी माणूस आणि त्यांचे सण याची ओळख पुसण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे. माघी गणेशोत्सवाच्या काळात विविध नियम आणि पर्यावरण ऱ्हासाचे कारण दाखवत गणेश विसर्जन रोखण्यात आले. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीबाबतही सरकारचे असेच सुरू आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. महायुती सरकारला मराठी माणासांच्या सणांबाबत एवढा आकस का आहे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

याबाबत एक्सवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय… आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी ‘माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम’ दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे…ह्या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? ‘चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची’, ही कसली निती?, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.