मधुचंद्रासाठी खोलीत गेले, सकाळी नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळले; पोलिसांनी दिली चक्रावून टाकणारी माहिती

मोठ्या थाटात लग्न झाले… नवविवाहित दाम्पत्य घरी आले… फुलं, सुगंधी अत्तर लावून मधुचंद्रासाठी सजवलेल्या खोलीत गेले… घरातील कुटुंबीय आणि वऱ्हाडी मंडळीही झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली आणि नवीन आयुष्याचे गुलाबी स्वप्न पहात जे दाम्पत्य मधुचंद्रासाठी खोलीत गेले होते त्यांचेच मृतदेह डोळ्यासमोर पाहून हादरून गेली. उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे मधुचंद्राच्याच रात्री नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रदीप आणि शिवानी असे या जोडप्याचे नाव आहे.

प्रदीप आणि शिवानी यांचे 7 मार्च रोजी थाटामाटात लग्न झाले. 8 तारखेला नवविवाहित जोडपे घरी आले. त्यानंतर सर्व विधी पार पडल्यानंतर दोघे मधुचंद्रासाठी सजवलेल्या खोलीत गेले होते. पण सकाळी बराच उशीर झाला तरी दरवाजा न उघडल्याने कुटुंबीय घाबरून गेले. दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडताच समोर जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

दरवाजा तोडताच नववधू शिवानी हिचा मृतदेह बेडवर आढळला, तर प्रदीप खोलीतील पंख्याला लटकत होता. यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात प्रदीपने आधी शिवानीचा गळा दाबून खून केला आणि त्यांना आत्महत्या केली असे समोर आले आहे.

प्रदीपने आधी पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला तेव्हा दोघेही निपचित पडले होते. दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तिसरा व्यक्ती खोलीत असण्याची शक्यता फार कमी आहे. दोघांचेही मोबाईल फोन कॉल्स, व्हाट्सअॅप चॅट यांची तपासणी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, प्रदीपच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. हा मेसेज कुणी पाठवला आणि त्यात काय म्हटले आहे याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या दृष्टीनेही तपास करत आहे.