मतदार यादीबाबत देशभरात संशयकल्लोळ; संसदेत चर्चा व्हायलाच हवी; राहुल गांधी यांची मागणी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. अधिवेशनाचा हा टप्पा 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले आहेत. विरोधी पक्षननेते राहुल गांधी यांनी विविध राज्यात झालेल्या निवडणुकांवेळी मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा उपस्थित केला. देशात मतदार यादीबाबत संशय आहे. त्यामुळे या गंभीर मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हायलाच हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, देशभरात जनता आणि विरोधी पक्ष मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करत आहे. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील मतदार यादीत गडबड असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मतदार यादीत गडबड करत या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यात आल्याचाही संशय आहे. त्यामुळे संसदेत या गंभीर मुद्द्यावर आणि मतदार यादीवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

याबाबात राहुल गांधी यांनी एक्सवरही याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मतदार यादी सरकार बनवत नाही, मात्र, त्यात गडबड झाल्याचा संशय देशभरात आहे. ब्लॅक अँड व्हाईट मतदार यादीत तर प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे विरोधी पक्ष संसदेत मतदार यादीवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्राच्या मतदार यादीत गडबड झाल्याबाबत आपण व्यक्तव्य केले होते. त्या आपल्या पत्रकार परिषदेला एक महिन्याहून अधिक काळ झाला, मात्र पारदर्शकतेबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आता मतदार यादीतील बोगस नावे घुसवल्याचे नवे पुरावे उघड झाले आहेत. त्यामुळे नवे आणि गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, असेही राहुल म्हणाले. त्यामुळे या गंभीर मुद्द्यावर संसदेत चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.