
कारखान्यातील घातक रसायन भरून आणलेले टँकर रात्री अपरात्री खुलेआम मोकळ्या जागेवर रिते केले जात आहेत. या भयंकर घटनांकडे प्रशासन कानाडोळा करत असतानाच आज तारापुरातील कुडण गावात एका तलावात लाखो मृत माशांचा खच पडल्याची घटना घडली आहे. मात्र प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी माशांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा जावई शोध लावला आहे. कारखानदारांच्या केमिकल लोच्याकडे कानाडोळा करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर येत मृत मासे आणि तलावातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. प्रचंड वाढलेल्या उष्णतेमुळे तलावाच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले असावे किंवा विषबाधेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र रात्री उष्णता येणार कुठून, असा सवाल नागरिकांनी केला आहे