
पारंपरिक व्यापाऱ्यांना डावलून अनोळखी व्यापाऱ्यांबरोबर केलेला व्यवहार उरणमधील मच्छीमारांच्या अंगलट आला आहे. निर्यातदार कंपन्यांनी या मच्छीमारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सुरुवातीला या कंपन्यांनी चांगला मोबदला दिला. मात्र आता या निर्यातदार कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी गायब झाल्याने मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. होळीचा सण जवळ आलेला असल्याने त्यांना कर्ज काढून खलाशांचे पगार द्यावे लागत आहेत.
मुंबईतील ससून डॉक बंदरातील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे सर्व सोयीसुविधांयुक्त अत्याधुनिक मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. सुमारे 250 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आले आहे. मासळीच्या निर्यातीसाठी रायगड जिल्ह्यासह स्थानिक हजारो मच्छीमारांना करंजा मच्छीमार बंदर सोयीचे आणि फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे या करंजा मच्छीमार बंदरातून मागील चार महिन्यांतच सुमारे 300 कोटी रुपयांची मासळी निर्यात करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी करंजा मच्छीमार बंदरात मासळीच्या खरेदी, विक्रीतून अंग काढून घेतले आहे. याचा फायदा उठवत काही नव्या निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी बंदरात शिरकाव केला आहे.
■ बंदरातील शेकडो स्थानिक मच्छीमारांनीही परिचित स्थानिक दलालांवर विश्वास टाकून मासळी विक्रीचे व्यवहार निर्यातदार कंपन्यांशी केले आहेत. सुरुवातीला निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांना मालाचे पैसे देऊन मच्छीमारांचा विश्वास संपादन केला.
■ गेल्या काही महिन्यांपासून मात्र या कंपन्यांनी स्थानिक मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवण्यास सुरुवात केली. आता कोट्यवधींची थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी पळ काढला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार
निर्यातदार कंपन्या आणि अपरिचित व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक केली असल्याचे निदर्शनास येताच अनेक स्थानिक मच्छीमारांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र निर्यातदार कंपन्यांनी मासळीचे पैसे अदा केले नसल्याने मच्छीमारांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे ऐन होळीच्या सणातच सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज काढून, दागदागिने गहाण ठेवून त्यांना खलाशांचे पगार, देणी चुकवावी लागत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमार, व्यापारी रमेश नाखवा यांनी दिली