मंत्रालयातील आधुनिक वाल्मीक कराड कोण? मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

sudhir mungantiwar

 

जो अधिकारी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतो त्याच्या ताटात यापुढे कधी भात देऊ नका, त्याच्या ताटात आम्ही माती, गोटे, लसणाची फोडणी करून घालतो. लाखो-करोडोंचा पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या अर्जांचा निपटारा करायचा नाही, मंत्रालयातील हा आधुनिक वाल्मीक कोण, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सरकारला केला.

चंद्रपूर, जिह्यात धान, कापूस पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरावर आक्षेप घेत कृषी विभागातील अधिकारी आणि सरकारवर आसुड ओढले.

यावेळी मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. सचिवांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे असे आम्हाला सांगू नका. सचिवालयाचे मंत्रालय केले आहे. राज्य सरकार एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतनावर 2 लाख 90 हजार कोटी खर्च करते आणि शेतकऱ्यांना मदत करताना हात मागे का घेता, असा सणसणीत सवाल केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यमंत्री जयस्वाल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवू, असे आश्वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.