चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकी दाखवणाऱ्या हमालांकडे सरकारचं दुर्लक्ष; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाल भेट देत तेथील हमालांशी संवाद साधला. त्यांनी हमालांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीवेळी हमालांनी दाखवलेल्या माणुसकीची आणि जीव धोक्यात घालत जखमींना केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दुर्घटनेच्या काळात माणुसकी दाखवणाऱ्या हमालांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यांची आर्थिक स्थिती बिकट असूनही सरकार त्यांच्यासाठी काहीही करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. एका हमालाने आपल्याला सांगितले की, अनेक दिवस आमच्याकडे जेवणासाठीही पैसे नसतात. आम्ही एकतर घरी पैसे पाठवतो किंवा स्वतः जेवतो. आपल्या हमाल बांधवांना अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी, या लोकांनी लोकांना मदत करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घातले, परंतु सरकारला त्यांचा आवाज ऐकू येत नाही. मी त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवेन आणि त्यांच्या हक्कांसाठी लढेन, असे राहुल गांधी म्हणाले.

एका हमालाने चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची आठवण करून दिली. आम्ही यापूर्वी कधीही एवढी प्रचंड गर्दी पाहिली नव्हती. आम्ही प्रशासनाप्रमाणेच लोकांना मदत देखील केली. आम्हाला स्थानकातून लवकर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग माहिती आहेत. यावर राहुल गांधी म्हणाले, अडकलेल्या लोकांना गर्दीतून बाहेर काढणे, जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवणे किंवा मृतदेह बाहेर काढणे यास्र्व कामांमध्ये हमालांनी माणुसकी दाखवत मदत केली.