फोटो, व्हिडिओ पाहिल्यावर सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड संतप्त झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो, व्हिडिओ पाहिल्यावर सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही. निर्दयी सरकारच्या हृदयात कालवाकालव कशी झाली नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यावर ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे कान टोचले आहेत. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. हे आरोपपत्र दाखल करताना अनेक फोटो आणि व्हिडिओ सादर करण्यात आले. या फोटोज् आणि व्हिडिओची कल्पना सरकारला आधीच होती. किंबहुना, हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते. पण, हे फोटो, व्हिडिओ पाहिल्यावर सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही; निर्दयी सरकारच्या हृदयात कालवाकालव कशी झाली नाही. हे सर्व पुरावे असतानाही राजीनामा घेतला गेला नाही. पण, काल रात्री हे फोटो, व्हिडिओ लोकांपर्यंत गेल्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, यावरून हे सरकार किती निर्दयी आहे, हे स्पष्ट झाले आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

लोकभावनेची कदर न करणारे हे पाषाणहृदयी सरकार संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा गुन्हा सहन करते. यावरूनच दिसतेय की महाराष्ट्राची अधोगती कोण करतोय? राज्यातील गुन्हेगारांची हिंमत वाढू लागलेय. पण #बुंद से गयी वो हौद से नही आती! आता महाराष्ट्रात होणारा लोक उद्रेक पाहून त्यास वेगळे वळण देण्यासाठी विरोधी आमदारांचे स्टेटमेंट घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कराल. पण असे स्टेटमेंट देणाऱ्याची मानसिकता आता जनता पुरती ओळखून आहे. त्याचा बोलवता धनी कोण असेल, हे जनतेच्या लक्षात आलेय! असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

Santosh Deshmukh case- अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा; महाराष्ट्रात उसळलेल्या संतापानंतर सुरू झाल्या हालचाली