ठसा – जगन्नाथ शिंदे

खंडप्राय  देश असलेल्या भारतात असंख्य जाती, विविध धर्म, वेगवेगळ्या भाषा आणि अनंत परंपरा आहेत, पण माणूस हा सर्वांचा समान धागा आहे. या प्रत्येक माणसाच्या आरोग्याचे प्रश्न एकसारखेच आहे. त्यात वेगळेपण नाही. अशा रुग्णांना सेवा देणारा एकच स्रोत आहे आणि तो म्हणजे केमिस्ट! आरोग्यदूताचे अविरत कार्य करणाऱ्या देशभरातील साडेसहा लाख केमिस्टच्या आशाअपेक्षा ज्या एकाच ठिकाणी एकवटल्या आहेत ते केंद्रस्थान म्हणजे अप्पासाहेब जगन्नाथ  शिंदे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहकार्यातून देशपातळीवरील सार्वत्रिक किंमती एकसमान राहाव्यात, किरकोळ विक्रीच्या किमतींतही एकसूत्रता यावी यासाठी किंमतीचे नियोजन करण्याविषयीचा पाठपुरावा करून जगन्नाथ शिंदे यांनी किंमती स्थिर व एकसमान ठेवून या व्यवसायात सुसूत्रता आणण्याचे बहुमोल कार्य केले. महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेच्या माध्यमातून त्यांनी 12 टक्के व्हॅटमुळे होणाऱ्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ठामपणे ग्राहकहिताचे रक्षण केले. त्याचा परिणाम म्हणून आणि संघटनेच्या आग्रही भूमिकेमुळे सरकारने एनडीपीएस कायद्यामध्ये बदल घडवून ग्राहकांना दिलासा दिला. देशपातळीवरील कार्यातही जगन्नाथ शिंदे कधीही मागे राहिले नाहीत. जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारगिल मोहिमेत मदतनिधी संघटनेच्या माध्यमातून पाठविण्यात आला. गुजरात भूकंपग्रस्तांना मदत व शाळांची निर्मिती, ओडिशा चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये पीडितांना सर्व सहाय्य व औषधांचे वितरण, विविध आजारांबाबत जनजागृती शिबिरे, एनडीपीएस या जाचक कायद्यातून औषध विक्रेत्यांची सुटका आदर्शवत ठरली.

रुग्ण आणि ग्राहकासोबतच प्रत्येक फार्मासिस्टच्या कल्याणाचा ध्यास जगन्नाथ शिंदे यांनी घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा झाला. जगन्नाथ सखाराम शिंदे यांचा जन्म 29 जानेवारी 1950 रोजी झाला. लोकहित आणि कार्यमग्नता याचे संस्कार झाल्याने जिद्द आणि मेहनती स्वभावाच्या शिंदे यांनी प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात केली. औषध विक्रेत्यांवर कोसळणाऱ्या संकटांना त्यांनी तोंड दिलेच, पण कोरोनाच्या अभूतपूर्व उद्रेकात रुग्णांना प्राण वाचविणारी औषधे-इंजेक्शन पुरविण्यापर्यंतच मर्यादित न राहता अन्नदान, निवारा, विमा संरक्षण देण्यात पुढाकार घेतला. केमिस्ट क्षेत्रात शिंदे गेली 50 वर्षे अविरत कार्यरत आहेत. प्रत्येक फार्मासिस्टच्या मागे भक्कमपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून जगन्नाथ शिंदे यांची ओळख आहे.